मुंबई: करोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्य उत्पन्नात सातत्याने होत आलेली घट यापार्श्वभूमीवर आगामी काळात करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजममंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना अजित पवार यांनी पत्र लिहिले आहे.
केंद्र सरकारने देशात तीन आठवड्याचे लॉकडाउन जाहीर केली आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु करोना आणि लॉकडाउनमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. परिणामी राज्यासमोर गंभीर आर्थिक स्थिती निर्माण झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती आणि राज्यासमोरील आव्हानांची माहिती पवार यांनी पत्रात दिली आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे 1 हजार 687 कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे 14 हजार 967 कोटी रुपये अशी एकूण 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही थकबाकी 31 मार्चपर्यंत राज्याला मिळावी, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.