चेन्नई – चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघावर विराट पराभवाची नामुष्की ओढावली. जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता पुढील कसोटी देखील याच मैदानावर होत असून विनाकारण आश्चर्यकारक बदल करण्यापेक्षा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात खेळवा, असा सल्ला विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी दिला आहे.
चेन्नईतील या विजयासह इंग्लंडने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. मात्र, रवीचंद्रन अश्विनचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही. इंग्लंडचे खेळाडू डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांना खेळताना अडखळतात म्हणून कुलदीप यादव याला डावलून नवख्या शाबाज नदीमला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत टीका केला होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघात बदल करावेत असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
चेन्नई येथे रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात एखादा बदल करणे गरजेचे आहे. दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव याला अंतिम 11 मध्ये संधी द्यायला हवी. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंसोबत तिसरा फिरकीपटू म्हणून कुलदीपला संघात स्थान द्यावे. अनुभवी अश्विन चेंडू हवेत संथगतीने सोडतो, तर सुंदर अश्विनपेक्षा जास्त वेगात चेंडू सोडतो. यांच्या जोडीला जर कुलदीप यादवला संघात स्थान दिले तर नक्कीच भारतीय गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळेल, असेही गावसकर म्हणाले.
सुंदरला दुसऱ्या सामन्यातून वगळणे कठीण आहे. कारण, गोलंदाजीत अपयशी ठरला असला तरी पहिल्या डावात त्यानं महत्वपूर्ण 85 धावांची खेळी केली होती. त्यामुळे सुंदरचं संघातील स्थान कायम राहील. दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला संघात ठेवायचे आणि कोणाला वगळायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. नदीम की सुंदर यांच्यापैकी कोणाला विश्रांती द्यायची, हे त्यांनाच ठरवावे लागेल. पण कुलदीपला दुसऱ्या कसोटीत स्थान मिळायला हवे, असेही गावसकर म्हणाले.