वाघोली (पुणे) – आकस्मित मृत्यूची नोंद झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता… मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याआधी पोलीस तक्रार व्हावी आणि गरिबाला न्याय मिळावा, अशी केली मागणी… मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी लोणीकंद पोलीस ठाण्यासमोर रात्री “गरिबाला न्याय द्या’ केला आक्रोश… आणि रात्री 1 च्या सुमारास एसपी साहेबांचा पोलीस ठाण्यात फोन आला आणि काही मिनिटांतच जबाब नोंदवून या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन नातेवाइकांना मिळाले आणि मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले.
याबाबतची माहिती अशी की, वाघोली भावडी (ता. हवेली) येथील खाण क्रमांक 4 मध्ये परशुराम मदन जाधव (वय 28) यांचे सोमवारी (दि. 15) निधन झाले होते. लोणीकंद पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद देखील केली होती. मात्र, मयत इसमाच्या नातेवाइकांना ही घटना घातपात असल्याचा संशय आल्याने त्यांनी शविच्छेदनानंतर मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याअगोदर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार पोलिसांनी न घेतल्याने नागरिक संतापले होते.
यावेळी मयताच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर (दि. 16) रात्री 12 पासून 1 वाजेपर्यंत “गरिबाला न्याय द्या’ अशा घोषणा देत मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार केला होता, त्यामुळे परिस्थिती तणावाची झाली होती. न्याय मिळत नसल्याने अखेर दीड तासाने पोलीस ठाण्यातून मयत व्यक्तीच्या नातेवाइकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना फोनद्वारे सर्व हकीकत सांगितली आणि काही मिनिटांमध्ये पोलिसांनी मयत व्यक्तींच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेत या प्रकरणी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.
पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणखाली आणली. तातडीने पुढील योग्य त्या कारवाईच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पहाटे चार वाजता नातेवाइकांनी मयत परशुराम जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. रात्री 1 च्या सुमारास पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची बाजू ऐकून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी पोलीस अधीक्षकांचे आभार मानले आहेत.