नगर – अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे शाळा व महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना तातडीने वेतन अनुदान देऊन शिक्षकांचे हाल थांबवा, अशी मागणी शिक्षक आमदार कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नगरचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर यांनीही त्या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे, अर्थमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे मेलद्वारे निवेदन देऊन ही मागणी केली असल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक वर्षे पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांत प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. वारंवार मिळणारी आश्वासनं, शासकीय लालफितीचा कारभार आणि तथाकथित पुढाऱ्यांनी केलेली आर्थिक पिळवणूक यामुळे या शिक्षकांच्या संयमाचा बांध आता तुटत चालला आहे.
त्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानासाठी गजानन खैरे आपल्या सहकाऱ्यांसह औरंगाबादहून अन्नत्याग पायी दिंडी करत मुंबईकडे निघाले आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक होत चालली आहे, अशी माहिती गाडगे यांनी दिली.
घोषित-अघोषित माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्वच विनाअनुदानित शिक्षकांना पगारापोटी बजेटमध्ये तरतूद केल्याप्रमाणे 20 टक्के आणि प्रचलीत धोरणानुसार त्यापुढील टप्पे विनाविलंब देण्याची मागणी शिक्षक नेते गाडगे यांनी केली आहे.
एकदा विधिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर त्यात पुन्हा त्रुटी काढून विलंब करणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिक्षक संघटनांचे पदाधिकारी विजय कराळे , बाबासाहेब लोंढे, योगेश हराळे, जितेंद्र आरु, महेश पाडेकर, किशोर ङोंगरे, संभाजी पवार. संतोष मगर, संतोष देशमुख, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, संभाजी चौधरी, किसन सोनवणे, संपत वाळुंज, कैलास जाधव, कारभारी आवारे, आशा मगर, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे, गोरक्षनाथ गव्हाने आदींनी या कृतीचा निषेध नोंदविला आहे.