उरुळी कांचन – महाराष्ट्रातील डोंगराळ भागात पाऊस पडत आहे. पुण्याच्याशेजारी चांगला पाऊस झाला आहे. परंतु हवेली, दौंड, पुरंदर तसेच इंदापूरसह अन्य तालुक्यात अजून चांगला पाऊस झालेला नाही. हे विठ्ठल यंदा ग्रामीण भागात चांगला पाऊस पडू दे, पिके चांगली येऊ दे. शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी राहतात. त्यामुळे हे विठ्ठला यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे. असे साकडे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी घातले.
प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या डाळींब बन येथील विठ्ठलाची पूजा खासदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. हवेली दौंड, पुरंदर तालुक्याच्या मध्यवर्ती डाळींब (ता. दौंड) येथे विठ्ठल बन आहे. विठ्ठलाची महापूजा खासदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात, आमदार राहुल कुल, विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, माजी सरपंच माऊली कांचन, माजी सरपंच एल. बी. कुंजीर, माजी जिल्हा परिषदेचे महादेव कांचन, सरपंच सुनीता धिवार, नानासाहेब म्हस्के, एल. बी. म्हस्के, शंकर कुंजीर, नानासाहेब झरांडे, उपसरपंच सागर कांचन, शंकर भूमकर, महादेव झरांडे, उपसभापती सुशांत दरेकर, सुनील गोते, डॉ. रवींद्र भोळे, निलेश चौधरी, जगदीश महाडिक, आण्णा महाडिक, अमित कांचन, दिलीप वाल्हेकर मान्यवर उपस्थित होते.
चार लाख वैष्णवांचा मेळा
प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या डाळींब बनात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिवसभर जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर गर्दीने फुलला होता. मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या. तसेच मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी दौंड, हवेली, पुरंदर तालुक्यातील भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे 4 लाख भाविकांनी दर्शन घेतले. परिसरात सामाजिक संस्थाकडून फराळाचे वाटप करण्यात आले. यंदा भाविकांची गर्दी वाढलेली होती.