नवी दिल्ली – जम्मू काश्मीरात प्रथम निवडणूक घेतली जाईल आणि त्यानंतर त्या राज्याला पुर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत विचार केला जाईल अशी जी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे ती घातक आहे असे कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
सरकारने प्रथम जम्मू काश्मीरला पुर्ण राज्याचा दर्जा दिला पाहिजे आणि त्यानंतर तेथे निवडणुका घेतल्या पाहिजेत अशी आमची व अन्य पक्षांची मागणी आहे असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. घोडागाडीला आधी घोडा असतो आणि नंतर त्याच्या मागे गाडी जोडलेली असते पण या सरकारला गाडीच्या मागे घोडे बांधायचे आहेत.
त्याची गरज काय असा सवालही त्यांनी केला आहे. काल केंद्र सरकारने जम्मू काश्मीर मधील विविध पक्षांच्या नेत्यांना दिल्लीत पाचारण करून त्यांच्याशी काश्मीरातील स्थिती बाबत चर्चा केली होती.
त्यात सरकारने आधी निवडणूका घेऊन तेथील लोकशाही प्रक्रिया सुरळीत करण्याची ग्वाही दिली होती. निवडणूक प्रक्रियेनंतर त्या केंद्रशासित प्रदेशाला पुर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार होऊ शकतो असे केंद्र सरकारने म्हटले होते.