रेंज नसलेल्या भागात टॉवर उभारण्याची मागणी
अकोले (प्रतिनिधी) – शालेय शिक्षण बुडू नये, यादृष्टीने सुरू असलेल्या ई- लर्निंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी, गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत स्मार्ट फोन किंवा टॅब उपलब्ध करून द्यावेत व ज्या भागात मोबाईलला रेंज नाही, त्या भागात टॉवर उभे करावेत, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी आमदार पिचड यांनी पत्रात निदर्शनास आणून दिले आहे की, सध्या देशात व राज्यात करोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. करोना या विषाणूमुळे मार्च 2020 ते अद्यापावेत सर्व शाळा बंद आहेत. या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. त्यामुळे कोणाच्याही हाताला कामधंदा नाही.कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही.
कुंटुंब चालविणे कठीण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले विधानसभा मतदारसंघामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचे शिक्षण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व त्यांच्या प्रगतीवर परिणाम होऊ नये यासाठी आपल्या स्तरावरुन ई-लर्निंगचे शिक्षण देण्याबाबत सूचना व आदेश प्राप्त झालेले आहेत. तसेच ग्रामीण भागातील शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक प्रत्यक्ष त्या गावात मुख्यालयी राहत नाहीत. ते राहिल्यास विद्यार्थ्यांचे छोटे- छोटे गट (समूह) करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता प्रमाण वाढेल व त्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.