लखनौ : उत्तरप्रदेशात आपला पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास भदोईला संत रविदास नगर असे नाव देऊ असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केले आहे. आज येथे जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या शहराचे नाव समाजवादी पक्षाच्या सरकारने जातीयवादी भूमिकेतून बदलेले आहे.
कॉंग्रेस आणि भाजपने संत रविदासांचा त्यांच्या कारकिर्दीत कधीच सन्मान केला नाही असा आरोपही त्यांनी केला. संत रविदास यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी आपल्या सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहितीही त्यांनी या निवेदनात दिली आहे. त्या म्हणाल्या की आमच्या सरकारच्या काळात वाराणसीत संत रविदास पार्क आणि संत रविदास घाट यांची बांधणी केली आहे.
तसेच त्यांच्या पुतळ्याची उभारणी करून त्यांच्या नावाने फैजाबाद येथे एका महाविद्यालयाची स्थापनाही आमच्या सरकारने केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. आज सर्व देशभर संत रविदास यांची जयंती साजरी केली जात आहे त्यानिमीत्त त्यांनी हे निवेदन जारी केले आहे.