-अशोक सुतार
विनोबा भावे यांनी 1932 मध्ये धुळे तुरुंगात दर रविवारी श्रीमद्भगवदगीतेच्या प्रत्येक अध्यायावर अठरा प्रवचने दिली होती. ही प्रवचने साने गुरुजी यांनी विस्तृत रूपाने लिहून घेतली. साने गुरुजींनी लिहिलेल्या “गीताहृदय’ या पुस्तकाचे प्रकाशन विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठानने केले आहे.
सहजसोपी भाषा, अध्यात्म व विवेकाची सांगड घालून लोकांना कसे जगावे याचे मार्गदर्शन गुरुजींनी केले आहे. या पुस्तकात श्रीमद्भगवदगीतेतील सारासार विचार आणि व्यवहारातील उदाहरणे देऊन गुरुजींनी जीवनाचे तत्त्वज्ञान वाचकांसमोर उघड केले आहे. साने गुरुजी म्हणतात, रामायणात प्रतिमेचा अपूर्व विलास आहे, काव्यशक्तीची पराकाष्ठा आहे आणि महाभारतात विश्वदर्शन आहे. महर्षी व्यासांनी अठरा पुराणे, महाभारत लिहिले. शेकडो कथा, आख्याने, उपाख्याने, शेकडो उपदेश यातून जीवन कसे आदर्शवत जगावे हे सांगितले आहे. या सर्वांचा सारांश म्हणजे हे पुस्तक होय.
पहिल्या अध्यायात अर्जुनाचा मोह, आसक्ती नष्ट करणे हा श्रीकृष्णाचा हेतू आहे. प्रत्येक मनुष्य अर्जुन आहे. त्याने ऋजू होऊन म्हणजे सरळ भाव व शुद्ध भक्तीने ज्ञानमय कृष्णाजवळ बसून मोह जिंकला पाहिजे, अनासक्त होऊन स्वधर्माचे आचरण केले पाहिजे. तरच आपल्या हातून समाजसेवा होईल आणि जीवन कृतार्थ होईल. दुसऱ्या अध्यायात साने गुरुजींनी गीतेचा आधार घेत म्हटले आहे, जीवनाचे तीन महासिद्धांत आहेत. ते म्हणजे, आत्मा सर्वत्र आहे, देह नाशिवंत आहे आणि स्वधर्म अबाध्य आहे. मनुष्य जीवनात नाना कृत्रिम भेद निर्माण करतो. जेव्हा नदीतील पाण्याला जागोजागी बांध घातले जातात, त्यावेळी ते पाणी सजीवांस उपद्रवी ठरते. त्याचप्रमाणे मनुष्याने जातींची डबकी उभी करून एकमेकांशी वाद, भांडणे सुरू केली आहेत. कारण आत्मतत्त्व न पाहता मनुष्य नाशिवंत देहालाच महत्त्व देतो.
कामक्रोध, वासना, लोभ यांवर विजय मिळवून संयमी व्हा, असा संदेश तिसऱ्या अध्यायात दिला आहे. चौथ्या अध्यायात कर्म, विकर्म आणि अकर्माचे महत्त्व सांगितले आहे. पाचव्या अध्यायात संन्यास व कर्मयोगाचे महत्त्व सांगितले आहे. सहाव्या अध्यायात जीवनात कर्मयोग कसा आणावा आणि कोणते उपाय करावेत, हे सांगितले आहे.
सातव्या अध्यायात आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे भक्तीचे प्रकार काही उदाहरणे देऊन सांगितले आहेत. नववा अध्याय म्हणताच संत ज्ञानेश्वर समाधिस्त झाले असे म्हणतात. नवव्या अध्यायात कोणतेही कर्म ईश्वरार्पण करा, असा संदेश आहे. पंधराव्या अध्यायात तीन पुरुष सांगितले आहेत. कर्म, भक्ती, ज्ञान असे मिळून पुरुषोत्तमयोग होतो. अठराव्या अध्यायात “उप संहार’ सांगितला आहे.
साने गुरुजींनी व्यवहारातील उदाहरणे देऊन पूर्ण पुरुषोत्तम बनण्यासाठी काय करावे लागेल याचे सार सांगितले आहे. हे पुस्तक विवेकपूर्ण विचारांचे जीवनात आचरण करण्यास शिकवते.