प्रशांत शिंदे
आयुष्यात येणाऱ्या अडचणी या कधीकधी डोंगरा एवढ्या वाटू लागतात. आलेल्या संकटांना पूर्ण ताकदीनिशी सामोरे न जाता ‘आता यातून मार्ग निघणारच नाही, आपण हरलोय, सर्वकाही संपलंय’ अशा नकारघंटा मनामध्ये वाजू लागतात. लढायच्या आधीच हार मानलेला माणूस मग आयुष्यभर त्याच ओझ्याखाली दबून जातो. काही जण मात्र वाटेत आलेल्या अडीअडचणींना सामोरे जातात, दोन हात करतात आणि जिंकतात सुद्धा! अशीच कहाणी आहे बिहारच्या १० वर्षीय सीमाची.
सीमा ही मूळची बिहारमधील जमुई येथील आहे. एका अपघातानंतर तीचा एक पाय कापावा लागला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्या नशिबी अपंगत्व आलं. पण यामुळे ती खचली नाही. ती उभी राहिली, एका पायावर!
शाळेसाठी एक किलोमीटरची पायपीट करावी लागते… आपल्याला तर एकच पाय… कसं जायचं शाळेत? असा प्रश्न सीमाला नक्कीच पडला असेल. आपल्याकडे काय नाहीये याचा विचार करत, रडत-खडत पडून राहण्याचा, आयुष्यभर नशिबाला कोसत बसण्याचा पर्याय सीमाकडेही होताच… पण सीमाने लढायचं ठरवलं!
ती एका पायावर उभी राहिली… नुसती उभीच राहिली नाही तर चालू लागली… शाळेत जाण्यासाठी सीमा रोज एक किलोमीटरची पायपीट एका पायाच्या भरवशावर करू लागली…
परिस्थितीला शरण न जाता दोन हात करणाऱ्या सीमाचा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालाय. देशभरातून सीमासाठी मदतीचा ओघ सुरु आहे. दोन पायावर चालण्याची वेळ आली आहे, तिकीट पाठवतोय असं मदतीचा हात पुढं करणाऱ्या सोनू सूदने म्हटलंय. बिहार सरकारने देखील मदतीची घोषणा केली आहे.
मुळात खचून न जाता उभं राहण्याचा आणि पुढं जाण्याचा निर्णय घेऊनच सीमा जिंकली होती. तिच्या या लढ्याला आता पाठबळ मिळू लागल्यानं तिची ही लढाई सोपी होईल.
सलाम सीमा आणि तिच्या सारख्या लढवय्यांना!