मुंबई – शरद पवारांनी भाजपवर केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही उत्तर दिले आहे. स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पवार आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विरोधी पक्षातील म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार, नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
महाजन म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडू लागले आहेत, कुणाल घ्यावं असा प्रश्न आम्हाला पडला आहे. मात्र स्वत:चं अपयश लपवण्यासाठी पक्षांतराचं खापर भाजपवर फोडले जात आहे. शरद पवार यांनी नावं घेतलेले सर्व नेते आम्हाला भेटून गेले आहेत. त्यांनी आम्हाला पक्षात घ्या, अशी विनंती केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 50-60 आमदार माझ्या संपर्कात आहेत. दोन-तीन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल. कॉंग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे, आठवडाभरात राष्ट्रवादीची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट होईल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई कायद्यानुसार सुरु आहे. सूडबुद्धीने कारवाई करायची असती तर सुनील तटकरे, अजित पवारांवरही कारवाई केली असती. ते तर दिग्गज नेते होते. पण आम्ही नियमानुसार कारवाई केली. ईडी, सीबीआय चौकशीमध्ये मुख्यमंत्री कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.