जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला. त्यानंतर आता फडणवीसांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव झाला, असे त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत मुक्ताईनगरची लढत ही चुरशीची असते. मतदारांचा पूर्ण पाठिंबा नसल्याने खडसे पराभूत झाले. सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले, परंतु मुक्ताईनगरची लढत चुरशीची असल्याने पराभव झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय सर्व पक्षांपेक्षा जास्त ओबीसी आमदार भाजपमध्ये आहेत. भाजप हा ओबीसींना प्राधान्य देणारा पक्ष आहे. तसेच भाजपमधील एकही आमदार फुटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता.