शिवसेनेचा उल्लेख टाळला; युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर
पिंपरी – राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार चांगले काम करत असून येत्या विधानसभा निवडणुकीत गतेवळी अधिक जागांवर विजय मिळवून भाजपा- महायुतीचेच सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळल्याने स्थानिक पातळीवर पुन्हा युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाला अतिशय चांगले वातावरण आहे. राज्यात 2014 पेक्षा चांगल्या जागांवर आम्ही विजय मिळवू. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही जागा गतवेळीपेक्षा अधिक मतांनी आम्हाला मिळतील याची खात्री आहे. जिल्ह्यातही भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बापट यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळला. युतीबाबत विचारले असता आम्ही कार्यकर्ते असून पक्षपातळीवर युतीचा निर्णय होईल. जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल. पालिकेच्या वतीने शहरात विकासकामे योग्य पद्धतीने चालू असून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पुढील काळात भरून काढल्या जातील, असेही बापट म्हणाले. गतवेळी दिलेल्या आश्वासनांची आम्ही पूर्तता केली असून शास्तीकर, अनधिकृत बांधकामे यावर तोडगा काढण्यात यश आले आहे.
शहरातील तीनही मतदारसंघातील विधानसभेसाठीची तयारी पूर्ण झाली असून प्रभागनिहाय बैठका, आढावा, बूथनिहाय काम पूर्ण झाले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. पक्षाच्या माध्यमातून मतदान वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. राज्यपातळीवरून ठरवून दिलेल्या धोरणानुसार आम्ही विधानसभेसाठी सज्ज असल्याचे बापट यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर स्वतंत्र जाहीरनामा – राज्य, केंद्र आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळे प्रश्न असतात. पिंपरी-चिंचवड शहराच्या पातळीवर विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचेही बापट यावेळी सांगितले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल – राष्ट्रवादीची महापालिकेत आणि राज्यात सत्ता असताना ज्या कामांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल तक्रारी आल्या त्यावर त्यांनी चौकशी केली होती. मात्र भाजपाच्या काळात अनेक तक्रारी येऊनही चौकशी होत नसल्याबद्दल विचारले असता राज्य शासन माहिती घेऊन कारवाई करत असते. महापालिकेत चांगले काम चालू असून अशी तक्रार कोणी केली असल्यास शासन दखल घेईल, एवढेच उत्तर देत भ्रष्टाचाराच्या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न बापट यांनी केला.
शास्तीकर, अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष – गतवेळी विधानसभा निवडणुकीतील दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याच्या प्रश्नावर बापट म्हणाले, आम्ही दिलेल्या आश्वासनावर तत्काळ अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. 60 ते 70 टक्के आश्वासनांची पूर्तता केली आहे. काही राहिली असतील तर ती पुढील काळात पूर्ण केली जातील.