बेगुसराई – तुमच्या प्रश्नांच्या संबंधात निष्क्रीयता दाखणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना बांबुने चोप द्या असे आवाहन थेट एका केंद्रीय मंत्र्यानेच केल्याने त्यातून मोठे वादंग निर्माण झाले आहे. गिरीराजसिंह असे या केंद्रीय मंत्र्यांचे नाव आहे. बेगुसराई येथील कृषी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले आहेत.
ते म्हणाले की आमच्या प्रश्नांविषयी अधिकारी अत्यंत निष्क्रीय असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. मी लोकांना सांगतो की अत्यंत छोट्या विषयांसाठी तुम्हीं माझ्याकडे का येता, खासदार, आमदार, सरपंच, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, बीडीओ या सगळ्यांनीच तुमच्या समस्यांमध्ये लक्ष घातले पाहिजे.
पण आता जर हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना सरळ बांबुचे फटके देऊन सरळ करा असे आवाहनही त्यांनी केले. आणि तरीही त्यांनी जर तुमचे ऐकले नाहीं तर मी तुमच्या पाठीशी राहीन असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना एका भाजप नेत्याने म्हटले आहे की गिरीराजसिंह यांचे विधान हे केवळ प्रतिकात्मक स्वरूपात आपण लक्षात घेतले पाहिजे, त्यांच्या विधानाचा शब्दश: अर्थ लक्षात घेण्याची गरज नाही असे त्या नेत्याने सांगितले.