मांडवगण फराटा (वार्ताहर) –शिरूर तालुक्याला भीमा व घोड या दोन नद्यांचे वरदान लाभले आहे; परंतु सध्या घोड नदीपात्र कोरडे पडल्याने शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील इनामगाव, तांदळी, शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी परिसरातील नगदी पिके धोक्यात आली आहेत.
घोडगंगा व श्रीगोंदा कारखान्याच्या ऊस लागवड धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना उस लागवड करावी लागणार आहे; परंतु नदीत पाणी नसल्याने ऊस लागवड कशी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
एप्रिल महिन्यात घोड नदीला पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण तयार झाले होते. यावर्षी लवकर पाऊस पडला नाही तर परिसरातील पिके जळून जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोड धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी आल्यामुळे बोअरवेल, विहिरींची पाणी पातळी चांगली होती; परंतु आता नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचाही पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. नदीला लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी इनामगावचे माजी उपसरपंच शिवाजी मचाले यांनी केली आहे.