देवाशी अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने अन् सख्यत्व भावाने जवळीक साधणे म्हणजेच सख्यभक्ती होय. “देव माझा, मी देवाचा’ हा भाव धरून देवाशी जवळीकता साधणे हे सख्यभक्तीचे लक्षण आहे. एकदा का त्या देवाशी आपण मित्रत्वाचे सख्यत्वाचे नाते जोडले की देव आणि आपण यांच्यातला दुरावा दूर होतो.
मग आपोआपच देवाला ज्या गोष्टीने संतोष होतो तसे आचार, विचार आणि कृती घडू लागते. भक्तिभावाने भगवंताचे नाम संकीर्तन, त्याच्या अवतार कार्याचे वर्णन अन् लीला कथन करणे या गोष्टी करण्यात आपल्याला आनंद वाटू लागतो. या कीर्तनसेवेने देवाशी सख्य साधले जाते. परस्परात एक प्रेमधागा गुंफला जातो.
देवाची जवळीक मिळवण्यासाठी वृत्तीची विषय गुंती प्रयत्न पूर्वक तोडावी. सुखावर पाणी सोडावे, तन, मन देवाला अर्पण करावे. सेवा करावी, भगवंत सेवा, देवाची जवळीक, त्याचे भजन, पूजन, अर्चन यात विशेष रस घ्यावा, कथा निरुपण करावे. ईश्वर चिंतन करावे. देवाशी जवळीक साधत असताना आपल्याला आपल्या जीवलगांचा त्याग करावा लागला, त्यांना दूर लोटावे लागले तरी लोटावे, शेवटी देवासाठी प्राणही अर्पण करावा. आपले सर्वस्व पणाला लागले तरी चालेल पण आपण भगवंताचे सख्य सोडू नये. देव दूर करू नये.
आपण देवाला आपला प्राण समजावे. जसे आपण आपल्या प्राणाला जपतो तसे देव आणि देवाची जवळीकताही जपावी. आपण आपले सर्वस्व अर्पण करून देवाशी सख्य साधले, म्हणजे देव आपली (भक्ताची) काळजी घेतो.
देव निज भक्तांचा कैवार घेतो, त्यांचा सांभाळ करतो. तो दिन-हिन-पतित, दुराचारी यांनाही तारून नेतो. देव हा अनाथांना मदत करतो. त्यांच्या पाठीशी उभा राहतो. देवाशी जर तुम्ही अर्जुनासारखे सख्य जोडलेत, तर तो जीवनाच्या महासंग्रामात तुमची पाठराखण करील. तुम्ही जर वारकऱ्यासारखे त्यावरच सारा भार टाकून त्याच्याशी जवळीक साधाल, तर तोच तुमचा सारा भार स्वत:च्या खांद्यावर घेईल. तुम्ही जर सुदाम्यासारखे निरपेक्ष मित्र प्रेमाने त्याच्या जवळ जाल, तर तुमच्या मूठभर भक्ती प्रेमाच्या पोह्यासाठी तो तुम्हाला स्वानंदाची सुवर्णनगरी देईल.
पण कधी, तर तुम्ही त्या श्रीहरीला जेव्हा खरोखरच तुमचा सखा मानाल, त्याला आपलासा कराल तेव्हा. त्यासाठी हा प्रेमाचा धागा आधी मोठ्या कुशलतेने गुंफावा लागतो, हे विसरून चालणार नाही.