मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, “वाईट नेता मिळणे, ही महाराष्ट्राची चूक नव्हे, पण त्या नेत्यासोबत राहणे ही मात्र चूक आहे, अशी घणाघाती टीका केली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीस या ऍक्सिस बॅंकेच्या पश्चिम भारताच्या उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट हेड आहेत.
ऍक्सिस बॅंकेमधील जवळपास दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांचे खाते एसबीआयमध्ये वर्ग करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे.
सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत.
अशाप्रकारे बॅंकेतील खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच, “वाईट नेता मिळणे, ही महाराष्ट्राची चूक नव्हे, पण त्या नेत्यासोबत राहणे ही मात्र चूक आहे, असे ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, यानंतर आता शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.