सत्यजित पाटणकर व शिष्टमंडळाची बैठक
पाटण – पाटण तालुक्यातील प्रलंबित धरणांची उर्वरित कामे तातडीने हाती घ्या. माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजित पाटणकर यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून पुनर्वसन व अपूर्ण कामे लवकरच मार्गी लावण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले.
पाटण तालुक्यातील चिटेघर, निवकने, मोरणा गुरेघर, बीबी आदी धरणांच्या प्रलंबित कामांबाबत राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त आदींच्या शिष्टमंडळाने ना. जयंत पाटील यांचेसह संबधित खात्यांचे अधिकारी यांचेसमवेत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी ना. पाटील यांनी हे आदेश दिले. या प्रकल्पांबाबत दै. प्रभातने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
पाटण तालुक्यातील धरणांची व पुनर्वसनाची प्रलंबित कामांबाबत सत्यजित पाटणकर यांनी मंत्रालयात जावून ना. पाटील यांच्याकडे या कामांचे निवेदन सादर केले. त्यावर तातडीने ना. पाटील यांनी शुक्रवारी सांगली येथे जलसंपदा व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.
यावेळी ना. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना पाटण तालुक्यातील भूमिपुत्रांच्या त्यागावर राज्याला पाणी व वीज मिळाली आहे. त्याच भूमिपुत्रांचे प्रश्न प्रलंबित रहाणे, ही दुर्दैवाची बाब आहे. माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या प्रकल्पांची सुरूवात केली. यापूर्वी व आताही विक्रमसिंह पाटणकर व सत्यजित पाटणकर यांनी सातत्याने या प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे. आता राज्यात आपल्याच विचारांचे शासन आहे व सुदैवाने हा जलसंपदा विभाग माझ्याकडेच आहे. त्यामुळे पाटणकरांच्या मागणीचा तितक्याच गांभीर्याने विचार होवून तातडीने हे प्रश्न मार्गी लावले जातील.
सत्यजित पाटणकर म्हणाले, राज्याच्या जीवनात प्रकाश टाकत सर्वांना पाणी देणाऱ्या पाटण तालुक्यात कोयनेसह अन्य अनेक छोटी, मोठी धरणे आहेत. विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक नव्या धरणांना जन्म दिला. त्याची महत्वाची कामेही त्याच काळात झाली. वर्षांत केवळ अपुऱ्या निधीपोटी ही कामे पूर्णत्वास गेली नाहीत.
त्यामुळे स्थानिक शेतकरी सुजलाम सुफलाम होवू शकला नाही. सोबतच काही ठिकाणी पुनर्वसनाचेही भिजत घोंगडे पडले आहे. आता पुन्हा राज्यात आपल्या मित्रपक्षांचे शासन सत्तेवर आल्याने आमच्या भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाला न्याय मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या खात्याचे मंत्री म्हणून नक्कीच ना. जयंत पाटील हे आम्हाला न्याय देतील. तालुक्यातील निवकने, चिटेघर, बीबी, मोरणा गुरेघर या धरणांच्या प्रलंबित कामांना तातडीने निधी द्यावा, पुनर्वसनाची प्रश्न कायमचा निकालात काढण्यात यावा. यासह कोल्हापूर पद्धतीचे मंजूर बंधारे तातडीने सुरू होवून नवीन बंधारेही मंजूर करण्यात यावेत, अशी मागणीही सत्यजित पाटणकर यांनी यावेळी बोलताना केली.
बैठकीस बापूराव जाधव, शंकरराव जाधव, व्ही. के. संकपाळ, सुनील शिंदे, मनोहर संकपाळ, आनंदराव पाटील आदींसह प्रकल्पग्रत तसेच सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडल अधिक्षक अभियंता पवार, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, उपविभागीय अभियंता सौरभ जोशी, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा पुनर्वसन, भूसंपादन अधिकारी तसेच जलसंपदा, महसूल, पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.