एक आठवड्यापूर्वी अहवाल सादर
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या समितीमार्फत नियमावली
पुणे – देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या समितीने एक आठवड्यापूर्वी मंत्रालयाकडे अहवाल सादर केला. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे दप्तराच्या ओझ्याखाली दबलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
मंत्रालयाने “एनसीईआरटी’च्या रंजना अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती नेमली होती. त्यात दप्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने नियमावली बनविलेल्या राज्यातील सदस्यांचा समावेश होता. त्यात महाराष्ट्राचा समावेश होता. सध्या देशात मुलांच्या दप्तराचे ओझे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांचे नियोजन, मुख्याध्यापकांचे दप्तर ओझ्याकडे होणारे दुर्लक्ष आणि पालकांची उदासिनता या कारणांमुळे शाळकरी मुलांना दप्तराचे ओझे न्यावे लागत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे.
समितीचे सदस्य असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवी दिल्लीत येथे दप्तर ओझे कसे कमी करता येईल, याबाबत बैठका झाल्या. त्यात अनेक राज्यांतील नावीन्यपूर्ण शिफारशींचा विचार करून अहवाल तयार करण्यात आला. फेब्रुवारी 2019 मध्ये हा अहवाल मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या नियमावलींचा अंतर्भाव करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पालकांचीही जबाबदारी
विद्यार्थ्यांच्या शाळेशी निगडित साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी कपाट, रॅक, पेटी किंवा बॅग ठेवावी. दप्तरात त्या-त्या दिवशी लागणारेच साहित्य ठेवावे. यासाठी आदल्या रात्री पालकांनी शाळेचे वेळापत्रक पाहावे; जेणेकरून आवश्यक तेवढ्याच वह्या-पुस्तके दप्तरात राहतील.
केंद्रीय समितीने अभ्यासपूर्ण अहवाल फेब्रुवारी 2019 मध्ये सादर केला होता. त्यानंतर त्रुटीची पूर्तता करावी, असे सूचित केले होते. त्यानुसार अंतिमअहवाल आठवड्यापूर्वी सादर केला आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याची देशभरात अंमलबजावणी होईल.
– रंजना अरोरा, समितीच्या अध्यक्षा
केंद्रीय समितीच्या अहवालातील वैशिष्ट्ये
दप्तरात रिकामी बॉटल, पण पाण्याची व्यवस्था शाळेत असावी
बॅगचे वजन हलके असावे
सत्रानुसार शाळेचे वेळापत्रक असावे
सायन्स, गणिताचे पुस्तक शाळेत आणू नये
केवळ भाषा विषयीची पुस्तके आवश्यक
गतवर्षीच्या मुलांचे पुस्तक संकलित ठेवून वर्गात ठेवावेत
दप्तराचे ओझे मुलांच्या वजनांच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे
दप्तराविना शाळा भरण्यासाठी प्रयत्न करावेत
महाराष्ट्राची काय नियमावली आहे?
पहिलीत मुलांच्या दप्तरांचे ओझे कमाल दोन किलो
आठवीत मुलांच्या दप्तरांचे ओझे हे 4.2 किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये
दप्तराचे ओझे पाल्याच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे
वह्यांची जाडी कमी करावी
दप्तराचा भार कमी व्हावा, त्यानुसार वेळापत्रक