14 प्रौढ, 8 बालके असे एकूण 22 कामगार
अमोल मतकर
संगमनेर – कारावासाची शिक्षा भोगावी, तशी तब्बल नऊ वर्षे पुणे जिल्ह्यातील मावळ गावामधील एका बागायतदाराकडे वेठबिगारी करणाऱ्या आदिवासी कुटुंबांची नुकतीच सुटका करण्यात आली. हे नऊ वर्षे म्हणजे त्यांच्यासाठी काळ्या पाण्याची सजा असल्यासारखेच होते. एका सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात यश मिळविले.
या आदिवासी कुटुंबामध्ये पारनेर तालुक्यातील 10, संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सात आणि राहुरी तालुक्यातील पाच, अशा एकूण 22 कामगारांचा समावेश होता. पुणे जिल्ह्यातील मावळ गावात एका बागायतदाराने नऊ वर्षांपूर्वी शेतीकामासाठी काही आदिवासी लोकांना आणले होते. त्याने सुरुवातीस रोजगार देण्याचे कबूल केले. अतिशय गरीब परिस्थिमुळे आणि मजुरी हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित बागायतदाराने या कुटुंबांना कमी मोबदल्यात कामे करून घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना पुन्हा घरी जाण्यास मज्जाव करण्यात आला. कुणाच्या सुख-दुःखात देखील त्यांना सहभागी होऊ दिले नाही. त्यामुळे त्यांना जणू कारावासातच ठेवल्याची जाणीव होत होती. तब्बल नऊ वर्षे ते कुटुंब त्या बागायतदाराकडे 14 प्रौढ आणि आठ बालके, असे एकूण 22 कामगार वेठबिगार म्हणून काम करत होते. नऊ वर्षे एका शेतजमिनीला तारेचे कंपाऊंडमध्ये राहण्यासाठी जेमतेम निवाऱ्यात हे आदिवासी कुटुंब राहत होते.
कंपाउंडबाहेर जाण्याची त्यांना परवानगी नव्हती. कोणी तसा प्रयत्न केला, तर त्याला तो बागायतदार शिवीगाळ करून मारहाण करायचा. रात्रीचे कोणी पळून जाऊ नये म्हणून त्या तारेच्या कंपाऊंडमध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात येत असे. त्यामुळे हे कुटुंब प्रंचड दहशतीखाली जगत होते.
मदन पथवे या सामाजिक काम करण्याऱ्या तरुणाला त्यांची करुण कहाणी समजल्यानंतर त्याने एका सामाजिक संघटनेच्या साह्याने प्रत्येक तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्या कुटुंबांची बागायतदाराच्या तावडीतून सुटका करण्यात यश मिळवले. पथवे हे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कुटुंबांना घेऊन संगमनेरच्या उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे आले. तहसीलदार निकम यांनी लागेल ती शासकीय मदत पुरवण्याचे आश्वासन दिल्यावर त्या आदिवासी कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले होते.
पुढच्या हप्त्यात मंडलाधिकारी, गटविकास अधिकारी, स्थानिक तलाठ्यांना घेऊन तहसीलदार त्या कुटुंबांना भेट देण्यासाठी जाणार असून, त्यांना शासनाच्या कोणत्या योजनांमध्ये बसवता येईल, याची खात्री करणार आहेत.
संबंधित बागायतदार पुरुषांना, महिलांना तसेच लहान मुलांना देखील मारहाण करायचा. आमच्या कडून शेतीची तसेच जनावरांची सर्व कामे करून घ्यायचा आणि आम्हाला कंपाऊंडच्या बाहेर देखील जाऊ दिले नाही. त्यामुळे आमचा बाहेरच्या जगाशी काहीच संपर्क नव्हता. मदन पथवे यांनी आमची मदत केल्यामुळे आमची सुटका झाली आहे.
पीडित
पुढील आठवड्यात कामगारांच्या मूळ गावी सर्व विभागांचे अधिकाऱ्यांसह त्यांना भेट देऊन त्यांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन, त्यांना मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांना आवश्यक सर्व कागदपत्रे नव्याने तयार करून दिले जातील. वेठबिगारी कामगार अधिनियम 2016 नुसार शासनामार्फत दिली जाणाऱ्या मदतीसाठी त्वरित शासनाकडे प्रस्ताव सादर करणार आहे.
अमोल निकम ,तहसीलदार, संगमनेर