नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी देशात काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या लसींना मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अजूनही देशात कायम आहे त्यातच आता देशावर आता बर्ड फ्लूचा विळखा वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशात काही दिवसांपुर्वी फक्त 4 राज्यांमध्ये परसलेल्या या संसर्गाने आता 10 राज्यांमध्ये हात पाय पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. ज्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली.
सध्याच्या देशावर आलेल्या संकटाला रोखण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळे अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत.
आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पसरणाऱ्या बर्ड फ्लूचा आढावा घेत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शिवाय स्थानिक जलस्त्रोतांच्या आजुबाजूला, प्राणी संग्रहालयात आणि कुक्कुटपालन केंद्रांतील परिस्थितीचा आढाव घेत इथे काटेकोरपणे नजर ठेवण्यावर जोर दिला. वन विभाग, आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग यांच्यातील जास्तीत जास्त समन्वय हे संकट थोपवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.