बिजिंग – पूर्व लडाख सीमेवर काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम असून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धास सज्ज राहाण्याचे आदेश दिले आहेत. देशाशी पूर्णपणे निष्ठावान रहा, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. शिन्हुआ या चिनी वृत्त संस्थेच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.
जिनपिंग यांनी नुकतीच गुआंगडोंग या चीनच्या लष्करी तळाला भेट दिली. सतर्क रहा आणि युद्धाच्या तयारीवर ऊर्जा केंद्रीत करा, असे जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला आवाहन केले. भारत, अमेरिका कि, अन्य कुठल्या देशासंदर्भात जिनपिंग यांनी हे वक्तव्य केले, ते अजून स्पष्ट झालेले नाही.
भारत, अमेरिका आणि दक्षिण चीन सागरातील अन्य देशांबरोबर चीनचा वाद सुरु आहे. चीनच्या भारताला लागून असलेल्या सीमेवर तर प्रचंड तणावाची स्थिती आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे 20 जवान, तर चीनचे 40 पेक्षा अधिक सैनिक ठार झाले. त्यानंतर पॅंगॉंग टीएसओ सरोवर परिसरात
गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीनची कुठलीही दादागिरी सहन न करता, भारतानेही प्रत्येकवेळी चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेबरोबरही त्यांचा वाद सुरु आहे.
पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पॅंगॉंग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे. चीनकडून टाइप 305 आणि टाइप 928 डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-90 ची कॉपी आहे.
चीन पॅंगॉंग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे. भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे.
जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे. ताज्या उपग्रह छायाचित्रांवरुन हा खुलासा झाला आहे.