मंचर (पुणे) – ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी होईल किंवा नाही, हा निर्णय राज्य स्तरावरील नेते मंडळी घेतील. जोपर्यंत महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढविण्याचा आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार निवडणुकींसाठी सज्ज रहावे, असे आवाहन कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या 29 ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे झालेल्या आढावा बैठकीत मंत्री दिलीप वळसे पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भीमांशकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, संचालक दत्ता थोरात, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उद्योजक प्रशांत अभंग, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, कैलास काळे, घोडेगांवचे उपसरपंच सोमनाथ काळे, प्रविण मोरडे, लक्ष्मण थोरात भक्ते, सुहास बाणखेले, संजय बाणखेले यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूक ही गावाच्या विकासकामांची महत्वाची स्वायत्ता संस्था म्हणून ओळखली जाते. कार्यकर्त्यांनी आपापसांत न भांडता पक्षाला नुकसान न होता सर्वांना बरोबर घेऊन विजयश्री खेचून आणावी, असे आवाहन करून मंत्री वळसे पाटील म्हणाले, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करुन विरोधकांचा पराभव करण्यासाठी कटिबद्ध रहावे. पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी मिळत राहते. त्यासाठी पक्षसंघटना आणि पक्षाची ध्येय धोरणे विस्तारण्यासाठी काम केले पाहिजे.
- मंचर नगरपंचायत होण्यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. गटबाजी करुन पक्षाचे नुकसान होईल असे वर्तन कोणीही करू नये.
-दिलीप वळसेपाटील, कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री