कच्चा माल महाग झाल्याचे दिले जातेय कारण
पुणे – गेल्या अनेक महिन्यांपासून कार कंपन्यांच्या विक्रीमध्ये फारशी वाढ होत नाही. मात्र, दरम्यानच्या काळात चलनातील अस्थिरता आणि इतर कारणांमुळे कच्च्या मालाच्या दरात वाढ होत असल्यामुळे कार कंपन्यांनी दरवाढ लागू केली आहे.
31 मार्च 2020 पासून कार कंपन्यांना “बीएस 6′ या मानदंडानुसार नव्या कार विकाव्या लागणार आहेत. त्या कारमधील तंत्रज्ञान महागडे असते. त्यामुळे बहुतांश कार जुन्या पद्धतीच्या कारपेक्षा महाग असणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये चलनातील अस्थिरतेमुळे या कंपन्यांना सुट्या भागाची आयात महागात पडत आहे.
सोमवारी भारतातील सर्वांत मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आपल्या काही वाहनांच्या दरांमध्ये 10 हजार रुपयांनी वाढ केली आहे. या अगोदरही कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र, आम्ही परिस्थिती खराब असल्यामुळे दरवाढ टाळली होती. आता दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या अर्थसंकल्पामध्ये मंदी कमी करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर कंपन्या निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, मारुती सुझुकीने तत्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.