महाविकास आघाडीच्या प्रतिसादाकडे नागरिकांचे लक्ष
वासुंदे (वार्ताहर) –पालखी महामार्ग जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा याबाबतची मागणी स्थानिक शेतकरी अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून त्यास कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. देहू ते पंढरपूर पालखी महामार्ग नूतनीकरणाची घोषणा केंद्र सरकारने केली असून, तसे राजपत्र प्रसिद्ध होऊन शेतकऱ्यांना त्याच्या नोटिसाही गिळाल्या आणि रीतसर मोजणी झाली असून, पंचनामेही झाले आहेत. मात्र आता सध्या महाराष्ट्रातील सरकार हे महाविकास आघाडीचे बनल्यामुळे या कामाला केंद्रातून विलंब होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. महामार्ग प्राधिकरणाने महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनी निश्चित केल्या आहेत. त्या निश्चित जागा सोडून शेतकरी सध्या वहिवाट करीत आहेत त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना विनामोबदला आपली शेती असूनही मशागत करता
येत नाही.
या भूसंपादनासाठी बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. आता त्यांची बदली झाली आहे. नोटिसांबरोबरच शेतकऱ्यांना मोबदलाही लवकरच मिळेल असे त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र यावर आता कोणती कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गच्या पाटस येथील बारामती फाटा चौकापासून सुरू होणाऱ्या पालखी मार्गाची भूसंपादन प्रकिया कित्येक दिवसांपासून रखडलेली आहे. या मार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या बाधित शेतकऱ्यांना आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे लवकरच कार्यवाही होईल आणि मोबदलाही मिळेल अशी
अपेक्षा आहे.
पालखी महामार्ग भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून तीन गावांचा विरोध आहे. त्याच गावातील काम फक्त बाकी आहे, संबंधित भूसंपादनाची रक्कम एनएचआय दिल्लीवरुन उपलब्ध होणार आहे, क्कम उपलब्ध झाली की भूसंपादन करण्यात येणार आहे.
दादासाहेब कांबळे, भूसंपादन अधिकारी संत पालखी महामार्ग
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल
शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्याबाबतची दखल घेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चालू लोकसभा अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असून, मागील महिन्यांत जिल्हा अधिकाऱ्यांकडेही पालखी महामार्ग संदर्भात बैठक घेतली होती. यापूर्वीही खासदार सुळे यांनी जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या आहेत तथापि त्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नसल्यामुळे तातडीने मोबदला मिळावा अशी मागणी केली होती; पण कार्यवाही काही झालेली नाही.
दौंड-बारामतीतून भूसंपादन होणारा परिसर
या कामासाठी दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, हिगणीगाडा आणि वासुंदे या गावातील जमिनी संपादित होणार आहे, तर बारामती तालुक्यातील खराडेवाडी, उंडवडी, गोजुबावी, कटफळ, एमआयडीसी, वंजारवाडी, रुई, सावळ, पिंपळी लिमटेक, काटेवाडी आदी गावांतून या रस्त्यासाठी भूखंड संपादित करण्यात येणार आहेत.