नवी दिल्ली : देशात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. त्यातच आता केंद्र सरकारला कोरोना व्यवस्थापनावर सल्ला देणाऱ्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर आपला महत्वाचा सल्ला दिला आहे. देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. व्हि.के. पॉल हे या टास्क फोर्सचे प्रमुख असून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भातील माहिती देतात. टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआरसारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
“३ ते ५ मे दरम्यान देशात करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारला करोनाबाबत सल्ला देणाऱ्या पथकाच्या प्रमुखांनी दिली होती. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाउन लावण्याची भूमिका मांडली असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच २० एप्रिल रोजी देशवासीयांना केलेल्या संबोधनात “लॉकडाउन हा शेवटचा पर्याय म्हणूनच राज्य सरकारांनी स्वीकारायला हवा”, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता केंद्र सरकारच्याच टास्क फोर्सने लॉकडाउन लावण्याच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे पंतप्रधान काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देशात सध्या ५ राज्यांच्या निकालांची चर्चा असून आज या सर्व निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.
दरम्यान, टास्क फोर्सच्या एका सदस्याने गेल्या काही आठवड्यापासून टास्क फोर्सचे सदस्य पंतप्रधानांना देशभर लॉकडाउन लावण्याचा पर्याय सांगत असल्याची माहिती दिली. “केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचा गेल्या काही महिन्यांपासून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण देशभरात लॉकडाउन लावायला हवा. त्या त्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरुपात निर्बंध लावण्याऐवजी राष्ट्रीय लॉकडाउनची गरज आहे. कारण करोना सगळीकडे पसरायला लागला आहे”, असे ते म्हणाले. आपण मुळातच करोनाकडे चुकीच्या बाजूने पाहात आहोत, असे टास्क फोर्सच्या या सदस्याने सांगितले आहे. “आपण भुयाराच्या चुकीच्या टोकाकडे पाहात आहोत आरोग्य व्यवस्था अमर्याद वाढवता येणार नाहीत. ऑक्सिजन पुरवठा वाढवूनही तो अपुरा पडतो आहे. आपल्याला रुग्णसंख्या कमी करावीच लागेल. किमान दोन आठवड्यांसाठी जर आपण हे सगळं थांबवू शकलो, तर आपण रुग्णवाढ रोखू शकू. यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी देखील मदत मिळू शकेल”, असे ते म्हणाले.
लॉकडाउनची मागणी करताना टास्क फोर्सकडून तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. “पहिला मुद्दा हा आहे की वेगाने होणारा प्रसार फक्त लॉकडाउननेच नियंत्रणात आणता येईल. जेव्हा करोनाचा समूह प्रसार होतो, तेव्हा चाचण्या करणं कठीण होऊन जातं. त्यामुळे सगळेच करोना पॉझिटिव्ह असल्याचे गृहीत धरून तुम्ही त्यांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकता. आणि हे फक्त लॉकडाउनमुळेच शक्य आहे”, असे या सदस्याने नमूद केले आहे.
“दुसरा मुद्दा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढू लागला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण हा प्रसार रोखण्यासाठी काही का करत नाहीत. अमर्याद रुग्ण, सुविधांचा तुटवडा यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने लक्ष घालणं आवश्यक आहे. आरोग्य सुविधांची तिथे मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही”, असे देखील या सदस्याने नमूद केले आहे.