पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यावर दाखल झालेल्या हरकतींचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
ज्या सर्व्हेनंबरमधील हरकत आहे, त्या सर्व्हेनंबरला जिओ टॅगिंग करणे, एकाच विषयासंदर्भात आलेल्या हरकती एकत्र करणे, कोणत्या भागातून किती हरकती आल्या आहेत. सर्वाधिक हरकती कशावर आल्या आहेत आदी माहिती समजणार आहे. या सुविधेमुळे हरकतींवर सुनावणी घेणे सोयीचे ठरणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
“पीएमआरडीए’ने प्रारुप विकास आराखडा मागील महिन्यात जाहीर केला. प्राधिकरणाच्या हद्दीत 831 गावांचा समावेश होतो. या “डीपी’वर हरकती अथवा सूचना नोंदविण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 31 हजारांहून अधिक हरकती प्रशासनाकडे आल्या आहेत.
एका बाजूला हरकती स्वीकारत असतानाच दुसरीकडे या हरकतींची डेटा इंट्री करण्यात येत आहे. या हरकती अथवा सूचनांवर सुनावणी घेणे सोयीचे जावे, यासाठी पीएमआरडीएकडून काळजी घेतली जात आहे. जिओ टॅगिंग सुविधेमुळे त्या सर्व्हेनंबरमधील वस्तुस्थिती समजण्यास मदत होणार आहे.
माहिती मिळणे सोईचे होणार
याविषयी अधिक माहिती देताना प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. दिवसे यांनी सांगितले की, दाखल होणाऱ्या प्रत्येक हरकतींना न्याय देता यावा, यासाठी प्रशासकीय सोईसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर सर्वाधिक कोणत्या भागातून आणि कोणत्या गोष्टीवर आल्या आहेत. हे कळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रत्येक हरकतीला कोड नंबर देण्यात आला आहे. यामुळे माहिती मिळणे सोईचे होणार आहे.