माधव विद्वांस
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. इंदिराजी कर्तव्यकठोर, मुत्सद्दी, पोलादी महिला होत्या. “बांगलादेश मुक्ती’ हे त्यांचे मोठे कर्तृत्व. त्यामुळे एक तरी सीमा सध्या शांत आहे. बांगलादेश मुक्तीच्या वेळी त्यांनी परराष्ट्रविषयक धोरणाने अमेरिकेलाही अचंबित केले, रशियाबरोबर मैत्री करार हा मोठा झटका त्यांनी अमेरिकेला दिला. इंदिराजींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी प्रयागराज (अलाहाबाद) येथे झाला.
त्यांचे शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल, सेंट ससिल्लिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट अलाहाबाद येथून झाले. याशिवाय एकोले इंटरनॅशनल, जिनेव्हा, एकोले नौवेल्ले, पुणे येथील बेक्स आणि पुपिल्स ओन शाळा, पुणे येथूनदेखील इंदिराजींनी शिक्षण घेतले. त्या मराठी उत्तम बोलत असत. नऊवारीसाडीही नेसत असत. पुढे शिकण्याकरता इंदिरा शांतिनिकेतनच्या विश्वभारती महाविद्यालयात गेल्या. प्रथम भेटीत रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचे नाव “प्रियदर्शिनी’ असे ठेवले. एक वर्षानंतर आपल्या आईच्या आजारपणामुळे त्यांनी ते विश्वविद्यालय सोडले. पुढे त्या युरोपला गेल्या. तसेच समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले. लहानपणापासून त्या आपल्या वडिलांबरोबरच राहिल्याने त्यांना समाजकारण व राजकारण यांची जवळून ओळख झाली.
इंदिराजी लहानपणापासून स्वातंत्र्यसंग्रामात जोडल्या होत्या. त्यांना महात्मा गांधीजींचा सहवासही लाभला होता. बालपणी त्यांनी “बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळीदरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता 1930 मध्ये लहान मुलांच्या साथीने “वानर सेना’ देखील उभी केली होती. असहकार आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना 1942 मध्ये अटकही झाली होती. फिरोज गांधी यांच्याशी 16 मार्च 1942 रोजी अलाहाबाद येथे वैदिक पद्धतीने त्यांचा विवाह झाला. 1955 मध्ये त्या कॉंग्रेस कार्यकारी समिती व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या. 1958 मध्ये त्यांना कॉंग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर त्या “एआयसीसी’च्या राष्ट्रीय एकता परिषदेच्या अध्यक्ष झाल्या व वर्ष 1956 मध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेस तसेच “एआयसीसी’ महिला विभागाच्या अध्यक्ष झाल्या.
1959 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. 1964 मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्याच कार्यकाळात इंदिरा गांधी सूचना व नभोवाणी मंत्री झाल्या. लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्या पंतप्रधान झाल्या. राजकारणात प्रत्यक्ष उतरल्यावर लोकांच्या भावनांना अचूक कसा हात घालायचा हे हेरून त्यांनी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ विरोधकांवर मात केली. बॅंक राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद यासारखे निर्णय घेऊन सामान्य लोकांची सहानुभूती मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या.
वर्ष 1971 मध्ये “गरिबी हटाव’चा नारा दिला. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले. खलिस्तान आंदोलन हे भारताच्या एकात्मतेस आव्हान होते, त्याविरुद्ध त्यांनी घेलेल्या कारवाईची त्यांना हौतात्म्य देऊन (31 ऑक्टोबर 1984)किंमत मोजावी लागली. शेवटच्या क्षणीसुद्धा त्या धीरोदात्त होत्या. त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले आहे.