माधव विद्वांस
अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक, लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी हरी नारायण आपटे, अर्थात ह. ना. आपटे, यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 8 मार्च 1864 रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या गावी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबई व पुणे येथे झाले. वर्ष 1918 मध्ये तत्कालीन पुणे नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते. शालेय जीवनातच त्यांचे इंग्रजी व संस्कृत साहित्याचे भरपूर वाचन होते. महाविद्यालयाच्या पहिल्याच परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाल्याने त्यांनी शिक्षण सोडले.
ब्रिटीश राज्य आले आणि शिक्षणाचे वारे वाहू लागले. मुद्रणाची सोयही उपलब्ध झाली आणि मराठी साहित्यातही आमूलाग्र क्रांती झाली. त्यामुळे लेखन आणि वाचन संस्कृतीही वाढू लागली.आपटे हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांचे शिक्षक गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले. त्याला “विकार विलासिता’ असे नाव दिले होते.
आपटे यांनी अनुवादाचे 72 पानांचे परीक्षण लिहिले व ते “निबंध चंद्रिका’ या त्या काळातील मासिकात वर्ष 1882 मध्ये प्रसिद्ध झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले लेखन. आपटे यांच्या समालोचनाबद्दल आगरकर यांनी मनापासून अभिनंदन केले. आपट्यांच्या लेखनातून तत्कालीन घरातील व बाहेरील स्त्रीचे जीवन व समस्या यावर प्रकाश टाकला गेला. त्यामुळेच अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.
त्यांनी “करमणूक’ व “ज्ञानप्रकाश’ या मासिकांचे काही काळ संपादक म्हणून काम पाहिले. आनंदाश्रम या संस्थेचे व त्यांच्या प्रकाशन संस्थेचे ते व्यवस्थापक होते. त्यांची कादंबरी बहुरंगी होती. त्यांच्या कादंबरीविश्वातील यमू, दुर्गी, शंकरमामंजी, भावानंद, गणपतराव, यशवंतराव इ. असंख्य व्यक्ती वाचकांना आपल्या जीवनाचाच भाग असल्याचे वाटत असे. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास हरिभाऊ करीत. त्यांच्या जबरीचा विवाह, घटकाभर करमणूक, गणपतराव-जग हें असें आहे’, पण लक्षात कोण घेतो?, मायेचा बाजार या सामाजिक तसेच म्हैसूरचा वाघ,उषःकाल, गड आला पण सिंह गेला, केवळ स्वराज्यासाठी, चंद्रगुप्त, वज्रघात या ऐतिहासिक कादंबऱ्या.
पुण्याचे “नूतन मराठी विद्यालय’ आणि “किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल’ यांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. भारतात प्लेगची साथीची रोगराई आली आणि आपटे यांनी त्यावेळी पीडितांची मदत केली. ते नगराध्यक्ष असताना महाराष्ट्रात इन्फ्लूएंझा साथीचा रोग होता त्यावेळीही त्यांनी पीडितांची काळजी घेतली त्यामुळे सत्ताधारी ब्रिटिश सरकारने त्यांच्या सेवांचा “कैसर-ए-हिंद’ पदकासह गौरव केला. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. 3 मार्च 1919 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले. अभिवादन.