अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक
नवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून देशात अत्यंत संवेदनशील असणाऱ्या अयोध्या राममंदीर प्रकरणावर पुढील आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केले आहे. या भेटीचा नेमका उद्देश काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राम मंदिराचा खटला देशातील सर्वात संवेदनशील निकालांपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.
रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यांच्या घटनापुढे झाली. या प्रकरणी कोणत्या दिवशी निकाल दिला जाणार हे अद्याप न्यायालयाने सांगितलेले नाही. पण 13,14 किंवा 15 नोव्हेंबर या तीन पैकी एका तारखेला न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. कारण 17 नोव्हेंबरला न्या. रंजन गोगोई सेवानिवृत्त होत आहेत.
सरन्यायाधीशांनी उत्तर प्रदेशमधील मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी आणि पोलिस महासंचालक ओमप्रकाश सिंग यांना आपल्या दालनामध्ये बैठकीसाठी बोलावले आहे. या निकालानंतर कोणताही हिंसाचार होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने गेल्या काही दिवसापासून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत.