माधव विद्वांस
भारताचे 13 वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1926 रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील श्रीधरपंत सरकारी अधिकारी होते. आईचे नाव इंदिरा, तर पत्नीचे नाव भानुमती. त्यांचे शालेय शिक्षण अलिबाग येथे व पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच सन 1944 मधे त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. भारताच्या स्वातंत्र्याच्या थोडेच दिवस आधी त्यांची सेवा 7 मे 1947 रोजी लेफ्टनंट म्हणून नियमित करण्यात आली होती. भारतीय लष्करातील अत्यंत बुद्धिमान, शूर आणि धाडसी लष्करप्रमुखांमध्ये त्यांची गणना होते. सन 1958-59 मध्ये वेलिंग्टन (तमिळनाडू राज्य) येथे त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते. काही काळ दिल्ली येथे सैनिकी सचिवाच्या विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांनी काम केले.
1965 सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ते लेफ्टनंट कर्नल या पदावर होते. त्यांच्याकडे डेक्कन हॉर्स विभागाचा पदभार देण्यात आलेला होता. या युद्धात आपल्या बुद्धीची आणि कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत त्यांनी चिमा भागात अतिशय चोख कामगिरी बजावली. या त्यांच्या शौर्यासाठी त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले होते.
सन 1971 सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी वैद्य “झफरवाल’ विभागाचे ब्रिगेडिअर होते. तेथील युद्धभूमीत जमिनीत पेरलेले सुरूंग होते. त्यावेळी जनरल वैद्य यांनी असामान्य धाडस दाखविले आणि स्वत: सुरुंगातून रस्ता मोकळा करून आपल्या संपूर्ण तुकडीस पुढे घेऊन गेले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यावर यशस्वी हल्ला करता आला. त्याच युद्धात बसंतर येथील कारवाईत आपल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत भारतीय रणगाडे सहिसलामत पुढे नेले व पाकिस्तानचे 62 रणगाडे नेस्तनाबूत केले. या त्यांच्या असामान्य धाडसाबद्दलही त्यांना पुन्हा एकदा महावीरचक्र प्रदान करण्यात आले. 31 जुलै 1984 रोजी जनरल वैद्य भारताचे तेरावे लष्करप्रमुख बनले. त्यांच्याच कारकिर्दीत अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ठाण मांडून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी “ऑपरेशन ब्लू स्टार’ पार पडले. या कारवाईचे संपूर्ण नियोजन जनरल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आले होते.
31 जानेवारी 1986 रोजी चाळीस वर्षांची प्रदीर्घ देशसेवा केल्यानंतर ते लष्करातून निवृत्त झाले आणि पुणे येथे वास्तव्यास आले. पुण्यातील लष्कर भागात 10 ऑगस्ट 1986 रोजी सायंकाळी पत्नीसह आपल्या कारमधून घरी परत येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्या पत्नीला चार गोळ्या लागून त्याही जखमी झाल्या होत्या. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अतिविशिष्ट सेवापदक आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. निधड्या छातीच्या लष्करप्रमुखांना सॅल्यूट.