जयपूर – राजस्थान काँग्रेसमधील क्रमांक दोनचे नेते सचिन पायलट यांनी उभा केलेले बंड शमवण्यात काँग्रेसला अखेर यश आलं आहे. पायलट यांच्या ‘घरवापसी’नंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी, “सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकार कालही बहुमतात होत, आजही आहे आणि भविष्यातही राहील.” अशी प्रतिक्रिया दिली.
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे मतभेद विकोपाला गेल्यानंतर पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. यानंतर जवळपास महिनाभर सुरु असलेल्या या राजकीय नाट्यावर कालच्या राहुल गांधी-सचिन पायलट भेटीनंतर पडदा पडला.
या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी पायलट यांच्या राजस्थानबाबतच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असा शब्द दिला होता. यानंतर पक्षाची भूमिका मांडताना के सी वेणुगोपाल यांनी, ‘पायलटांच्या तक्रारींची पक्षांतर्गत त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी केली जाईल.’ असं स्पष्ट केलं होत.
दरम्यान, पायलट यांच्या ‘घरवापसी’नंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना, “राज्यातील सत्ता उलथवण्याचा भाजपचा डाव फसला असून यामुळे भाजप नेत्यांची नाचक्की झाली आहे. मी माझ्यावर व पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या १०० आमदारांचे मनापासून आभार मानतो. भाजपच्या घोडेबाजार व धमक्यांना भीक न घालता एकत्र राहून त्यांनी इतिहास बनवला आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.
मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी गेहलोत यांनी पायलट यांच्या नावाचा उच्चार करणे टाळत आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला.
5 साल तक सरकार चलेगी। सरकार बहुमत में पहले थी, आज भी है, कल भी रहेगी।
:Talked to media in Jaipur today pic.twitter.com/UOLSNXVtRL
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) August 11, 2020