जयपुर – सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये कोविड लसीच्या संबंधातील बयानबाजीने वाद निर्माण झाला असून या वादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हस्तक्षेप करावा अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांच्या लसींना अनुमती मिळाल्यानंतर त्यांच्यात झालेली बयानबाजी दुर्देवी आहे. हा संवेदनशील विषय असून त्यात मोदींनीच हस्तक्षेप केला पाहिजे.
सीरम इन्स्ट्यिुटच्या आदर पुनावाला यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भारत बायोटेकच्या लसीच्या उपयुक्तते विषयी शंका व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने गहलोत यांनी ही मागणी केली आहे. गेहलोत यांनी ब्रिटनहून प्रसारीत होत असलेल्या करोनाच्या नवीन विषाणुंच्या प्रादुर्भावाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की ब्रिटन मधील विषाणुंचा धोका कायम असताना भारत सरकारने 8 जानेवारी पासून ब्रिटनच्या विमानांना अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुळात जानेवारी 2020 सालीच जर विदेशातून येणारी विमाने थांबवली असती तर भारतात करोनाचा इतका मोठा प्रादुर्भाव झालाच नसता असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ब्रिटनच्या नव्या विषाणुंबद्दल सरकारने अधिक जागरूक राहून उपाययोजना केली पाहिजे.