जयपूर – राजस्थान काँग्रेसमधील क्रमांक दोनचे नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज पायलट समर्थक आमदार राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनास उपस्थिती लावणार असल्याचे वृत्त एका नामांकित वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.
या वृत्तामुळे आता पायलट यांचे बंड शमणार की ही पायलट यांची आणखी एक राजकीय खेळी ठरणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना गेहलोत म्हणतात, “ते बंडखोर आमदार काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक जिंकले असल्याने त्यांनी विधानसभा अधिवेशनास उपस्थिती दर्शवावी अशीच माझी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री या नात्याने आमचे सर्व आमदार सरकारसोबतच आहेत हे जनतेला दाखवून देणं माझं कर्तव्य आहे.”
I still want that those unhappy MLAs should attend the assembly session as they’ve been elected on Congress symbol. It’s my responsibility to ensure that they are seen standing with the government in front of the public: Ashok Gehlot, Chief Minister, #Rajasthan pic.twitter.com/xqtpsmpt1J
— ANI (@ANI) July 30, 2020
तत्पूर्वी, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यादरम्यान कुरबुर असल्याची चर्चा होती. मात्र सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावत ही कुरबुर चव्हाट्यावर आणली होती. पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांच्या मानधरणीचे प्रयत्न करण्यात आले मात्र त्याला अद्याप तरी यश आल्याचं दिसत नाही.
दरम्यान, पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील व राजस्थान सरकार देखील मध्य प्रदेश सरकारप्रमाणे कोसळेल अशी चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून अशोक गेहलोत यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत बहुतांश आमदार राखण्यात यश मिळवल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.