नवी दिल्ली – काँग्रेसतर्फे आज बंडाचे निशाण फडकवलेल्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. याबाबतची घोषणा करताना रणदीप सुरजेवाला यांनी चर्चेसाठी यावं असं आवाहन पायलट यांना पुन्हा एकदा केलं. मात्र पक्षाने घेतलेला निर्णय पाहता पायलट काँग्रेसपासून दूर गेले आहेत हे सत्य काँग्रेस नेतृत्वाने स्वीकारलेलं दिसतंय.
पायलट यांच्या गच्छंतीची घोषणा करताना, भाजपने पायलट यांना सोबत घेऊन राजस्थानातील काँग्रेस सरकार पडण्याचा डाव रचला आहे असा थेट आरोप लावण्यात आला. तसेच पायलट यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना पक्षातर्फ़े महत्वपूर्ण जबाबदाऱ्या व पदे देण्यात आली असंही सांगण्यात आलं.
पायलट यांच्या गच्छंतीसोबतच राजस्थानात आज आणखी एक प्रमुख राजकीय घडामोड घडली. काँग्रेसला पाठिंबा देत असलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आमदारांनी आपला पाठिंबा मागे घेतला असून यातील एकाने काँग्रेसतर्फे आपल्याला ओलीस ठेवण्यात आल्याचा दावा केला आहे.
भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आमदार कमी झाल्याने आता गेहलोत यांच्याकडे १०० आंद्रणाचे पाठबळ उरले आहे. गेहलोत यांना सत्तेत राहायचं असल्यास त्यांना १०१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
दरम्यान, आज राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कालराज मिश्रा यांची भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी पाहता विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपतर्फे सत्ताधाऱ्यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे.