पुणे : कोकण हापूस आंब्याचा हंगाम संपल्यानंतर यंदा वीस दिवस उशिरा सुरू झालेल्या गावरान आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. वातावरणातील बदलाने यंदा उत्पादन कमी झाले असून, बाजारात आवकही कमी होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे भाव वाढले आहेत. बाजारात दर्जानुसार एक डझन आंब्यास 150 ते 300 रुपये भाव मिळत आहे.
महिनाअखेरपर्यंतच हंगाम सुरू राहील.
नैसर्गिकरीत्या पिकविलेला, रसाळ आणि चवीने गोड असल्याने गावरान आंब्यास चांगली मागणी असते. त्यामुळे मार्केटयार्डात गावरान आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. सुमारे 20 मे ते 30 जूनपर्यंत या आंब्याचा हंगाम असतो. गेल्यावर्षी दररोज 250 ते 300 क्रेट्स आवक होत होती. यंदा 10 ते 30 क्रेट्सची आवक होत आहे. वातावरणातील बदल, लांबलेला पाऊस, थंडीअभावी मोहर न लागणे, वादळ आदी कारणांमुळे यंदा अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ 10 ते 20 टक्केच उत्पादन हाती लागले.
आवक कमी आणि मागणी जास्त त्यामुळे यंदा आंब्याच्या भावात वाढ झाली आहे. दरवर्षी साधारण 200 ते 250 रुपये डझन इतका भाव एक डझन आंब्यास असतो. सध्या बाजारात पायरी आंब्याची आवक थांबली आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील गावरान आंब्याचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी दिली.