क्रिकेट इज अ जंटलमन्स गेम असे संबोधले जाते. मात्र, आता हा भूतकाळ झाल्याचेही सातत्याने दिसून येते. सभ्य गृहस्थांच्या या खेळात आता असेही काही खेळाडू आहेत की जे सातत्याने गैरवर्तन करताना दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. आता या खेळाडूंबरोबरच काही प्रशिक्षकही आपला संयम सोडताना दिसतात. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार असाच प्रश्न आता क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हे जास्त प्रकर्षाने दिसत आहे. रिकी पॉंटिंग, माहेला जयवर्धने, गौतम गंभीर व प्रवीण आमरे यांच्यासह अनेक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफमधील काही प्रतिष्ठित व्यक्तीही आपला तोल सांभाळू शकत नसल्याचे या स्पर्धेत दिसून आले. प्रशिक्षकाचे काम खेळाडूंना सरावादरम्यान तसेच बैठकीत प्रत्येक गोष्टीसाठी अवगत करणे असते.
प्रत्यक्ष मैदानावर खेळाडूंनाच खेळायचे असते. त्यानंतरही जर खेळाडू अपयशी ठरला तर त्याला खडे बोल सुनावण्याची जागा ही संघाची ड्रेसिंग रुम असते थेट सामन्याचे प्रक्षेपण सुरु असताना खेळाडूंच्या नावाने शिव्या देणे हे निदान क्रीडासंस्कृतीत तरी शोभणारे नाही.
परवा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव दिसू लागल्यावर लखनौ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक व माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीरने चक्क शिवगाळ सुरु केली. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला व त्यावर चाहत्यांनी गंभीरवर टीकाही केली.
गंभीरच्या लखनौ संघाने दिल्लीचा पराभव केला मात्र, या सामन्यात लखनौ संघाची गोलंदाजी अत्यंत सुमार होत होती, ती पाहात असतानाच गंभीर चक्क त्याच्याच खेळाडूंना तसेच दिल्लीच्या फलंदाजांवरही भडकल्याचे दिसले तसेच तो शिविगाळ करत असल्याचे दिसले. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग व सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनीही यंदाच्या स्पर्धेत दिल्लीच्या प्रत्येक पराभवानंतर आपल्या व समोरच्या संघातील खेळाडूना तसेच पंचांच्या निर्णयावरुन आगपाखड केली आहे.
पॉंटिंग व आमरे यांनी तर थेट पंचांशी हुज्जतही घातली होती, त्यांना उद्देशून शिवराळ भाषाही वापरली होती. आयपीएल समितीने आमरे यांच्यावर कारवाईही केली होती. मात्र, ही कारवाई पुरेशी नसल्याचेच सध्या दिसत आहे. एका सामन्याची बंदी संपल्यावर डगआऊटमध्ये जाखल झालेले आमरे आक्रमकच दिसले. आपल्या संघाविरोधात गेलेले निर्णय अनेक प्रशिक्षकांच्या पचनी पडताना दिसत नाहीत. ते पंचगिरीवर मुद्दाम टीकाही करतात. यात पॉंटिंग तर सर्वात जास्त माहिर आहे.
तो ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत असताना तसेच संघाचे नेतृत्व करतानाही अनेकदा गैरवर्तनामुळे वादात अडकला होता त्यामुळे त्याच्याकडून सभ्य वर्तनाची अपेक्षा करणेही चूक ठरेल. मात्र, आयपीएल समितीने खेळाडूंबरोबरच आता प्रशिक्षकांवरही सातत्याने वॉच ठेवला पाहिजे व जर त्यांच्याकडून गैरवर्तन घडले तर त्यावर कठोर कारवाईही केली जावी तरच हा खेळ जंटलमन्स गेम राहील.