सातारा – गणेशोत्सव उत्साहात सुरू झाल्यावर सुवासिनींना वेध लागले होते, ते गौरींच्या आगमनाचे. घरोघरी गुरुवारी गौराई विराजमान झाल्या. सुवासिनींनी गौराईंचे स्वागत केल्यानंतर घराघरांत त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी गौराईंना गोडाचा नैवेद्य दाखवून हळदी कुकंवाचा वसा देत, “गौराईच्या कपाळी कुंकवाचा टिळा शोभतो बाई, तुझी वाट भोळा शंकर पाहतो ग बाई’ अशी गाणी म्हणत महिलांनी आकर्षक सजावट केली होती. माहेरवाशिणींचा मान घेऊन गौराई उद्या (शनिवार) निरोप घेणार आहेत.
“पाऊस पडू दे, गंगा भरू दे, भादव्यात मी येईन गं… तेरड्याच्या फुलांवर, वस्ती मी करीन गं’, असा निरोप गेले महिनाभर पाठविणारी गौराई माहेरी आल्याने सगळीकडे आनंदीआनंद झाला होता. गौराईला आणण्यासाठी गुरुवारी फुलोरा घेऊन सुवासिनींनी आपापल्या भागात गर्दी केली होती. फुले, आघाडा, दुर्वा, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी सजविलेले, लखलखीत घासलेले तांब्या- पितळेचे न्हावण घेऊन आणि जरीच्या साड्या, अंगभर दागिने, हातभर बांगड्या लेवून गौराईची गीते गात गौराईंच्या आगमनाचा सोहळा शहरासह जिल्ह्यात रंगला.
अनुराधा नक्षत्रावर गुरुवारी गौरींचे आवाहन झाले असून, ज्येष्ठा नक्षत्रावर जेवण तर आज मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन होणार आहे. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला माहेरवाशिणींचा मानपान देण्यासाठी महिलांनी घराघरात आकर्षक सजावट केली होती. दोन दिवस मनोभावे सेवा करून आज या माहेरवाशिणींना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.