नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय समारंभासाठी तसेच निदर्शनांसाठीही 50 पेक्षा अधिक लोकांना राजधानी दिल्लीत एकत्र जमता येणार नसल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी जाहीर केले.
नव्या नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीनबाग आणि जामिया मिलायिा इस्लामिया येथे गेल्या 90 दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. कोरोनापासून मुक्त राहण्यासाठी मास्क आणि हॅंड सॅनिटायझर आंदोलकांना पुरवण्यात येत आहेत, असे शाहीनबागेतील आंदोलकांनी सांगितले. दिल्ली सरकारने जीम, नाईट क्लब आणि स्पा मार्चअखेर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
50 जणांच्या अधिक लोकांचा सहभाग असणाऱ्या कोणतेही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम 31 मार्चपर्यंत घेता येणार नाहीत. हे निर्बंध सर्व प्रकारच्या निदर्शकांनाही लागू आहेत, असे ते म्हणाले. मात्र विवाह समारंभांवर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र त्यांनी विावाहाच्या तारखा पुढे ढकलाव्यात असा जनतेला सल्ला देत आहोत. सर्व ऍटो रिक्षा आणि टॅक्सी विनामुल्य निर्जंतुकीकरण करून देण्यात येतील. तसेच सर्व मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येतील.
कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास त्यासाठी पुरेशा खाटांची सोय करण्यात आली आहे. विलगिकरण कक्षासाठी लेमन ट्री, रेड फॉक्स आणि आयबीआयएस या तीन हॉटेलमध्ये सोय करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि स्वीमींगपूल तसेच सीनेमागृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते.