मुंबई – सध्या भारतामध्ये रेशन दुकानावर स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र केवळ या व्यवसायावर या दुकानदारांना पुरेसा नफा मिळत नाही. यासाठी या दुकानाच्या माध्यमातून स्वयंपाकाचा गॅस आणि इतर वित्तीय सेवा सुरू करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर या विषयावर गेल्या आठवड्यात तपशिलात चर्चा केली आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान, वित्त, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यानंतर पांडे यांनी सांगितले की, या दुकानातून केवळ धान्य पुरवठा केल्यामुळे या दुकानदारांना पुरेसा नफा मिळत नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होते. यासाठी हि दुकाने फायदेशीर ठरण्याची गरज आहे.
यासाठी नावीन्यपूर्ण विचार करण्यात येत आहे. राज्याना विचारात घेऊन या संबंधातील निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी ही सूचना स्वागतार्ह असल्याचे सांगितले. शहरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सहज उपलब्ध होतो. मात्र तालुके आणि खेड्याच्या ठिकाणी स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत.
जर स्वस्त धान्य दुकानात स्वयंपाकाचा गॅस विक्रीसाठी उपलब्ध झाला तर ग्रामीण जनतेची सोय होणार आहे. या कामी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पेट्रोलियम कंपन्यांनी दिले. या दुकानाच्या माध्यमातून संयुक्त सेवा केंद्र सुरू करण्याची कल्पना काही राज्यांनी मांडली असून त्यावरही विचार करण्यात येत आहे.
या दुकानातून कर्ज, ठेवी अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करण्याचा शक्यतेवर विचार चालू आहे. यासाठी आवश्यक ती मदत अर्थमंत्रालय करणार असल्याचे सांगण्यात आले. या दुकानाच्या माध्यमातून मुद्रा योजनेतील कर्ज उपलब्ध करण्याच्या शक्यतेवर आहे विचार केला जाणार आहे. देशात तब्बल 5.26 इतकी स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानाच्या माध्यमातून विविध सेवा दिल्यानंतर जनतेला त्याचा फायदा होणार आहे.