निरंजन भाकरे यांचे नाव बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एक विख्यात भारुडकार म्हणून त्यांच्या नावाचुा दबदबा होता. भारुडचंद्रिका चंदाताई तिवारी मालेगावी आल्या, त्यावेळी त्यांनीही भाकरेंचे कौतुक केलं होतं. त्यामुळे त्यांना केव्हातरी कार्यक्रमासाठी आपण बोलवायचं हे ठरवलं होतंच, तो योग सहा वर्षांपूर्वी जमून आला. माझे वडील स्व. गोविंदराव गोरवाडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली 20 वर्षे आम्ही एका लोककलावंताचा कार्यक्रम मालेगावी आयोजित करीत असतो.
भाकरेंचा मोबाइल नंबर मिळवून त्यांना कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली आणि ते येण्यास तत्काळ तयार झाले. ठरल्याप्रमाणे आठ-दहा लोकांचा अत्यंत तयार संच मालेगावी पोहचला. थोड्यावेळात परिचय होऊन, कलावंत मोठा असला तरी पाय जमिनीवरच आहेत, याचा प्रत्यय आला. रात्री प्रचंड गर्दीत भाकरेंनी भारुडास प्रारंभ केला. अडीच-तीन तास अविश्रांत प्रखर ऊर्जेने केलेलं ते सादरीकरण अद्भुत होतं.
संत एकनाथांनी भाकरेंसाठीच जणू भारुडं लिहिली असावीत की काय, असं वाटण्याजोगा तो कार्यक्रम होता. भाकरेंचे सारे सहकलावंत कमालीचे मुरलेले, लोककलेची जाण असणारे, “त’ म्हणता तपेलं ओळखणारे, कार्यक्रम उंचीला कसा न्यायचा याची पूरेपूर जाण असणारे होते, पण त्या साऱ्यांचा श्वास होता निरंजन भाकरे.
उत्तम वेशभूषा, खणखणीत आवाज, अध्यात्माचा अभ्यास, कुठेही न अडखळता मोठाली वाक्य उच्चारण्याची विशिष्ट ढब, हे सारं भाकरेंनी प्रयत्नपूर्वक मिळविलेलं होतं. भाकरे हा स्वत:च स्वत:हून पैलू पाडलेला एक जातिवंत लखलखीत चौरंगी चिरा होता.
श्रोत्यांवर शब्द-सूर-अभिनयाची मोहिनी घालून कार्यक्रम संपला. कार्यक्रमानंतर तासभर लोक भाकरेंच्या भोवती सह्या घ्यायला, हस्तांदोलन करायला, कौतुकाचे चार शब्द बोलायला, पायावर डोके ठेवायला उत्सुक होते. रात्री उशिरा भोजनोत्तर भाकरे परतीच्या प्रवासाला लागले. मात्र त्या एका कार्यक्रमाने आमचं चांगलं मैत्र जुळून आलं आणि संपर्कात वारंवारिता आली.
भाकरे वेगवेगळ्या टी.व्ही. वाहिन्यांवर दिसले की घरातला माणूस दिसल्याचा आनंद होई. नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत भाकरेंचे भारुड व्हावे, असे मला वाटू लागले. म्हणून मग व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांना भाकरेंची महती सांगितली. तेही ती जाणून होतेच. मग त्यावर्षी या प्रतिष्ठित व्याख्यानमालेचा समारोप भाकरेंच्या अभूतपूर्व भारुडाने साजरा झाला आणि गोदातीर सुखावला.
निरंजन भाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद या छोट्याशा खेड्यातले. त्यांचे वडील भजन गात. वडिलांच्या त्या गोड गायनाचा लहानपणी भाकरेंवर कमालीचा प्रभाव पडला. पुढे शालेय शिक्षण संपल्यावर औरंगाबादला 10 रुपये रोजाने ते कामाला लागले. पुढे लग्न झालं. पगारात भागायचं नाही म्हणून वेगवेगळ्या कलापथकांमध्ये पेटीवादक म्हणून ते जाऊ लागले. भारुडांची आवड त्याकाळात निर्माण झालेली होतीच.
एक दिवस वृत्तपत्र वाचत असताना, त्यात लोकसाहित्याचे अभ्यासक आणि इंडियन नॅशनल थिएटर या विख्यात संस्थेचे संचालक अशोक परांजपे यांच्या विषयीची माहिती वाचनात आली आणि अशोकजींना भेटावेसे वाटू लागले. अशोकजी तेव्हा औरंगाबादमध्येच असायचे. अशोकजींची भेट झाली, त्यांच्यासमोर भारुड म्हणून दाखविण्याचा योग आला आणि अशोकजींनी भाकरेंमधला अस्सल भारुडकार ओळखला.
या कलावंताला थोडेसे मार्गदर्शन केल्यास भाकरे खूप पुढे जातील याची अशोकजींना खात्री होती. पुढे “सोंगी भारुडां’चे शुटींग भाकरेंना घेऊन इंडियन नॅशनल थिएटरने केले, त्यावेळी आय.एन.टी.च्या कर्मचाऱ्यांना ते खूप आवडले आणि भाकरेंचे नशिब उघडले. त्यानंतर भाकरेंनी भारुडांच्या कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि महाराष्ट्राला सोंगी भारुड करणारा जातीवंत भारुडकार लाभला.
मुंबई-पुणे-नागपूर-नाशिक या महानगरांसोबत सारा महाराष्ट्र भाकरेंनी भारुडाच्या माध्यमातून पिंजून काढला. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही प्रमुख सूत्रांचा स्वीकार करून भाकरे भारुड सादर करीत. “बया तुला बुरगुंडा होईल गं’ हे त्यांचे भारुड ठाण्याला सुप्रसिद्ध कलावंत अशोक हांडे यांनी पाहिले आणि त्यांच्या “मराठी बाणा’ या कार्यक्रमात भाकरेंची वर्णी सन्मानाने लागली.
“मराठी बाणा’मुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या इतर प्रांतातही भाकरे पोहोचले. मराठी माणसाच्या तर ते मनातच वसले. अमेरिकेच्या शिकागो शहरात भाकरेंच्या भारुडाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. शिवसिंग राजपूत या गुणी कलावंताने भाकरेंच्या या साऱ्या कलाप्रवासात त्यांना मोलाची साथ दिली.
अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे गेलेला हा कलावंत आपल्या कलेच्या जोरावर असंख्य पारितोषिके-मानसन्मान मिळवता झाला. अलीकडे भाकरेंनी 90 मीटर कापडाचा पायघोळ तयार केला होता. 20 किलो वजनाचा तो पायघोळ घालून ते घेत असलेली विलक्षण गिरकी श्रोतृवृंदाला चकीत करणारी ठरत असे. गणेशवंदना, नंदीबैल, वासुदेव, कुडमुड्या जोशी, न्हावी, भविष्यकार यांसह विविध भारुडे ते प्रचंड ऊर्जेने सादर करीत असत.
मधल्या काळात दासनवमीच्या निमित्ताने भाकरेंना पुन्हा एकवार मालेगावी बोलविण्याची संधी मिळाली आणि मालेगावकरांनी भाकरेंच्या भारुडाचा आनंद पुन्हा लुटला. मागच्या वर्षी त्यांचा फोन आला, “”मला पद्मश्रीसाठी नामांकन मिळाले आहे, महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून शिफारसपत्र जोडावी लागतील. तुमचे एक पत्र द्या.”
खरं तर माझ्या पत्राची भाकरेंना गरज नव्हतीच. मी तातडीने त्यांना हवे तसे पत्र दिले. अर्थात त्यावर्षी “पद्मश्री’चा योग हुकला. तो येणाऱ्या एखाद्या-दुसऱ्या वर्षात नक्कीच जुळून आला असता यात शंका नाही. पण भाकरे त्यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने “पद्मश्री’हून अधिक उंचीचे कलावंत होते.
सध्याच्या करोना कालखंडात सगळीकडे कमालीची जीवघेणी उलथापालथ सुरू असताना बातम्याही बघाव्याशा वाटत नाही.
पण काही महत्त्वाच्या सूचना सुटू नये म्हणून त्या बघितल्या जातात. 24 एप्रिलला मराठी वृत्तवाहिनी लावली, तर भाकरेंचे खणखणीत आवाजातले भारुड सुरू होते. म्हटलं, कुठे कार्यक्रम करताहेत, बघावं, तर खाली ओळ होती, “सुप्रसिद्ध भारुडकार निरंजन भाकरे यांचे निधन!’ क्षणभर श्वास थांबला. मनाला अतिव दु:ख झालं. काय चाललं आहे हे सारं, हा प्रश्न पुन्हा एकवार पडला. उभ्या महाराष्ट्रातील लोककलाप्रेमी त्यांचा एक भारुडसम्राट गमावून बसले. निरंजन भाकरेंसारखा अस्सल भारुडकार पुन्हा न होणे!
डॉ. विनोद गोरवाडकर