बाणेर येथील स्मार्ट सिटी गार्डनची देखभालीअभावी दुरवस्था
– अभिराज भडकवाड
औंध – बाणेर येथे लाखो रुपये खर्च करून बालेवाडी फाट्याशेजारी उभारण्यात आलेल्या स्मार्ट सिटी गार्डनची देखभालीअभावी दुरवस्था झाली असून सर्व स्मार्ट सुविधा बंद आहेत. रात्रीच्या वेळी साधे दिवेही लागत नसल्याने हे गार्डन तळीरामांचा अड्डा बनला आहे.
वायफाय, सौरऊर्जा, ओपन जिम, लायब्ररी, योगा हॉल तसेच लहान मुलांची खेळणी या सगळ्या गोष्टी बंद असून गार्डनमधील झाडेही वाळून गेली आहेत. स्मार्ट सिटीचे “घाण गार्डन’ अशीच ओळख निर्माण होऊ लागल्याची चर्चा नागरिकांत आहे.
स्मार्ट सिटी गार्डनमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांची वर्दळ असते. सकाळी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी योगा, व्यायामासाठी येतात. तर, नागरिकांची वर्दळ दिवसभर असते. संध्याकाळी लहान मुले खेळण्यासाठी गर्दी करतात. परंतु, दोन महिन्यांपासून वॉचमन तसेच कर्मचाऱ्यांना गार्डनची स्वच्छता करावी लागत असून देखभालीअभावी गार्डनची दुरवस्था झाली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात कचरा साठत आहे. रात्रीच्या वेळी दिवे नसल्यामुळे येथे तळीरामांचा अड्डा जमतो आहे. “शासकीय’ पाहुणे येणार असले की येथील लायब्ररी उघडली जाते अन्यथा ती बंद असते.
स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याअभावी झाडे वाळून चालली आहेत. बागेतील वायफाय सुविधा गेली कित्येक महिने बंद आहे. स्मार्ट सिटी गार्डनच्या दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट सिटी तर्फे प्रचंड पैसा खर्च करूनही या प्रकल्पाच्या दयनीय अवस्थेमुळे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारी करूनदेखील कोणीच लक्ष देत नाही. जागतिक महिलादिनावेळी आम्ही ज्येष्ठ महिलांना घेऊन उद्यानाजवळ आंदोलन करणार आहोत. त्या दिवशी येथील कचरा मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल यांच्या कार्यालयाबाहेर टाकणार आहोत.
– प्रकाश चव्हाण, निरामय हास्य योग क्लब, बाणेर
संबंधित उद्यानांच्या कामाच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा निघाली की, येथील स्वच्छतेची व इतर कामे मार्गी लागतील. तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी स्वच्छतेची कामे करून घेण्यात येत आहेत.
– गणेश फडतरे, कनिष्ठ अभियंता, स्मार्ट सिटी