पुणे – शहरातील करोनाच्या नव्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन काम करत आहे. अशामध्ये अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु, क्वारंटाईन घरांमधील कचरा उचलण्याची सोयच नसल्याचे वास्तव सध्या समोर येत आहे. याप्रकरणी सजग नागरिक मंच अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
पुण्यामधील करोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. बहुसंख्य लोकांना होम क्वारंटाईन केले जात आहे. अशा वेळी त्यांच्या घरातील कचरा वेगळा गोळा करून तो जाळून टाकण्याची व्यवस्था पुणे महापालिकेने तातडीने करण्याची गरज आहे, असे विवेक वेलणकर यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी पुण्यात करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असताना पुणे महापालिकेने होम क्वारंटाईन बाधितांचा कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा केली होती. ज्यामध्ये पुण्याच्या प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र गाडी व त्यावर स्वच्छता सेवकांचा एक संघ कार्यरत होता. होम क्वारंटाईन घरामधील लोकांनी आपला ओला व कोरडा कचरा स्वतंत्र ठेऊन तो पिशव्यांमध्ये पॅक करून त्यावर सॅनिटायझर मारून दोन दिवसातून एकदा येणाऱ्या या वेगळ्या गाडीच्या सेवकांसाठी ते कचरा गोळा करायला येतील तेव्हा दाराबाहेर ठेवावा अशी योजना होती. ही सेवा पूर्णपणे मोफतही होती.
सध्या ही योजना बंद असल्याने अनेक ठिकाणी या क्वारंटाईन घरांमधील कचराही सोसायटीच्या इतर कचर्यात मिसळून टाकला जातो आहे जे अत्यंत धोकादायक आहे ज्यातून करोनाचा प्रसार वाढू शकतो.
करोनाचा वाढता प्रसार पाहता आपण तातडीने पुण्यातील क्वारंटाईन घरांमधील कचरा स्वतंत्रपणे उचलण्याची सोय परत सुरू करावी, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.