पुणे – दरवर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणुका आकर्षण असते. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक होणार नसून, ‘श्रीं’चे विसर्जन उत्सव मंडपात होणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांच्या वतीने देण्यात आली.
यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले.
यावेळी श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील इतर गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या उत्सव मंडप किंवा मंदिरात आणि नागरिकांनी घरच्या घरी गणरायाचे विसर्जन करावे. तसेच फिरत्या हौदांचा देखील उपयोग करावा. याद्वारे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल, असे आवाहनही या मंडळांतर्फे करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवार, दिनांक 31 आॅगस्ट रोजी पूर्वसंध्येला मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी एकत्रपणे केसरी वाडयात आरती करुन लोकमान्यांना मानवंदना देणार आहेत, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.