ईश्वराची अंत:करणपूर्वक केलेली आळवणी म्हणजे आरती. उपासकाला हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती होय. आरती हे सगुण उपासनेचे सोपे माध्यम आहे.
आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक व पारमार्थिक लाभ होऊन देवतेविषयी भाव वाढून अनुभूती येते. तसेच देवतेची शक्ती व चैतन्य यांचा लाभ होतो. आरती म्हणणे म्हणजे देवतांच्या अस्तित्वाची साक्षात अनुभूती होय.
गणपतीला अग्रपूजेचा मान आहे म्हणून गणपतीची आरती सर्वप्रथम म्हणतात. समर्थ रामदासांनी मोरगावमध्ये गणपतीचे अर्थात मोरयाचे ज्या रूपात दर्शन घडले, त्या रूपाची स्तुती करणारी “सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती रचली. शतकानुशतके या सुंदर आरतीचे मंगलमय सूर भाविकांच्या हृदयातून उमटत आहेत.
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शन मात्रे मनकामना पुरती। जयदेव जयदेव ।।धृ।। या चरणात समर्थ म्हणतात, मनातील इच्छा फलद्रूप होणे म्हणजे सुख. श्री गणेश असा सुखकर्ता आहे. दुःख नाहीसे करणारा
दुःखहर्ता व विघ्ने दूर करणारा विघ्नहर्ता आहे.
अशा गणेशाला सर्वांगाला शेंदुराची उटी लावलेली आहे. गळ्यात मोत्यांची अलौकिक माळ शोभून दिसत आहे. या प्रसन्न दर्शनाने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात.
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुम केशरा।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया।।
गौरीने आपल्या कुमाराच्या मस्तकावर हिरेजडित मुकुट घातला आहे व त्याच्या मध्यभागी लावलेले पदक म्हणजे फरा हा रत्नजडित आहे. चंदन, कुंकुम व केशराची उटी लावलेल्या बाल गणेशाच्या पायातील वाळ्यांमधील घुंगरू मधुर नाद करीत आहेत.
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना।।
उदरात अनंत ब्रम्हांडे साठवलेला हा लंबोदर फणीवरबंधन आहे. म्हणजे गणेशमूर्तीच्या कमरेवर नागाचा करगोटा आहे. भगवान श्री शंकरांनी गणेशाच्या उपनयन संस्काराच्या वेळी गळ्यातील नाग काढून तो गणेशाच्या कमरेला करगोटा म्हणून बांधला.
नाग हे योगाचे प्रतीक आहे. सज्जनांसाठी सरळ व दुर्जनांसाठी वक्रतुंड असा हा त्रिनयन गणेश आहे. दास रामाचा वाट पाहे सदना यातील सदन हे आत्मसाक्षात्काराचे व ज्ञानाचे सदन आहे.
समर्थ हे रामाचे दास असून त्यांनी श्री गणेशाला तू सर्वांना संकटकाळी मदत कर अशी साद घातली आहे. प्रत्यक्ष भगवंत समोर आहेत अशा आर्तभावाने तसेच आरतीच्या पूर्वी तीनवेळा शंखनाद करून, योग्य शब्दोच्चार करून, टाळ्या वाजवून व मंजुळ घंटानाद करून तसेच टाळ, झांज, पेटी,
तबला या वाद्यांची तालबद्ध साथ देऊन भक्ती भावाने आरती म्हटली तर श्री गणेश प्रसन्न होतात. अशा स्वरूपातील उपासना भाविकांना आध्यात्मिक सुख म्हणजे श्रेयस सुख प्राप्त करून देते. आणि अशा सदाचरणी, मेहनती व योग्य दिशेने अथक परिश्रम करणाऱ्या भक्तांवर श्री गणेश आपली कृपादृष्टी ठेवतात.