मुंबई- सामाजिक भान ठेवत समाजोपयोगी कार्यक्रम राबवून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले.
आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. करोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. करोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल.
ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ, पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करु, यासाठीचा कार्यक्रम निश्चित करुन आपण हा सण साजरा करु, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गणेश मंडळांच्या मार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, याचा आपण विचार करु व हा उत्सव साजरा करु. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दरम्यान, पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. शिर्डी, सिद्धिविनायक आणि यासारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.