शेवगाव (प्रतिनिधी) : गंगामाई साखर कारखान्याचे चालू हंगामामध्ये किमान १२ लाख मेट्रीक टन गाळपाचे उदिष्ट असून कारखान्याकडे नोदंणी केलेल्या संपूर्ण ऊसाचे तोडणी प्रोग्राम प्रमाणे गाळप केले जाईल, अशी हमी कारखान्याचे तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्माकर हरिभाऊ मुळे यांनी येथे दिली.
तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याचा १० वा बॉयलर अग्नी प्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चीफ फायनान्सियल ऑफीसर व्हि.एस. खेडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी द्वारकाताई यांचे शुभहस्ते बॉयलर व गव्हाणीची विधिवत पुजा करून करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजीत मुळे, संचालक समिर मुळे, संदीप सातपुते, तांत्रिक सल्लागार एस.एन. थिटे, जनरल मॅनेजर एस. डी. पवार, प्रॉडक्शन मॅनेजर आर. पी. वाळुंज, मुख्य शेतकी अधिकारी आर.एस.कचरे, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार सोशल डिस्टन्सीग नियमांचे पालन करत उपास्थित होते.
मुळे म्हणाले, यावर्षी परिसरात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने उसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली . यामुळे कारखान्यासमोर नोंदणी झालेल्या संपुर्ण उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कारखान्याने साखर उत्पादन कमी प्रमाणात घेवून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले आहे. कारखान्याकडे नोदंणी केलेला ऊस तोडणी प्रोग्राम प्रमाणे गाळपास घेऊन, तो संपुर्ण ऊस गाळप केला जाईल. तरी कोणीही तोडणी प्रोग्राम व्यतिरिक्त ऊस तोडीसाठी आग्रह न करण्याचे कारखाना व्यवस्थापनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले .