येरवडा – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने केलेल्या गंभीर मारहाणीत युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात घडली.सागर महादेव भालेराव (वय 24, रा. मुंजाबावस्ती, धानोरी) याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला असून सहा संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकात सागर याची किरकोळ वादातून भांडणे झाली. याच भांडणातून दुसर्या गटातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी पटट्यासह लाथाबुक्यांनी मारहाण करून पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत सागर गेला असता त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रविंद्र कदम यांनी धाव घेतली. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.