मुंबई – सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करोनाची संसर्गीत वाढल्यास पुन्हा निर्बंध वाढविण्याची शक्यता मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर व्यक्त केली. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधांच्या विघ्नाविना पार पडणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
अस्लम शेख म्हणाले, करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर अखेरपर्यंत कोविड रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार आहे.
अस्लम शेख म्हणाले, करोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना नाईट कर्फ्यू, संचारबंदी जमाव बंदी लागू केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तूर्तास नाईट कर्फ्यु, संचारबंदी, जमावबंदीची गरज नाही. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत करोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले.
रुग्णसंख्येत स्पाईक दिसला तर निर्बंध कठोर होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन झाले तर निर्बंध लाण्याची वेळ येणार नाही. पण, सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. अमेरिका, युरोपमध्ये लसीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.