पुणे -अवघ्या 15 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. दरवर्षी जवळपास महिनाभर आधीच मूर्ती विक्रेत्यांची शहरात गर्दी होते. मात्र, यावर्षी काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून बाजारात “बाप्पां’च्या मुर्तींची संख्या मात्र कमी असल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाने राज्यभरात थैमान घातले. यामुळे अनेक ठिकाणी मूर्ती पाण्याखाली गेल्या. तर काही ठिकाणी मूर्तींसाठी लागणारे साहित्यच वाहून गेले. त्यामुळे याचा फटका पूर परिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यातील मूर्तिकारांना बसला आहे.
राज्यातील मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने पेण, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहून मूर्ती आणल्या जातात. मात्र, यंदा पावसामुळे कोल्हापूर येथील स्थानिक मूर्तीकारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शहरांतील व्यापाऱ्यांना देखील याचा फटका बसला आहे.
लहान आकारातील मूर्तीसाठी किमान 300 रुपयांचा खर्च येतो. तर नवीन आकारातील मूर्ती तयार करण्यासाठी येणारा खर्च हजारोंच्या घरात असतो. मूर्ती कारखान्यांच्या बहुतांश मूर्तींचे नुकसान झाल्याने कारखानदारांना आर्थिक फटका बसल्याचे स्थानिक मूर्तीकारांनी सांगितले. राज्यातील या स्थितीचा मूर्तीकारांनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनादेखील फटका बसला आहे. यंदा गणपती मूर्तीच्या किमतीमध्ये सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यामुळे परराज्यातील व्यावसायिकांना फायदा होत आहे. मध्य महाराष्ट्रापेक्षा सीमा भागांमध्ये अनेक परराज्यांतील विक्रेते हा व्यवसाय करत आहेत. काही भागांमध्ये कर्नाटक आणि राजस्थानमधील मूर्तीकारांचा शिरकाव झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पावसामुळे तळमजल्यासह दुसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या तयार निम्म्यापेक्षा अधिक मूर्तींचे नुकसान झाले. अनेक भागांमध्ये मूर्तीकारांच्या शेड पडल्या, मशीन्स, साहित्य वाहून गेले. नदीच्या कडेला असणाऱ्या मूर्तीकारांना सर्वाधिक नुकसान झाले. शाडूच्या मातीच्या मूर्ती पूर्ण विरघळून गेल्या. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पुरामुळे नुकसान झाले. दरवर्षीपेक्षा यंदा 70 ते 80 टक्के मूर्तीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
– रोहित कांबळे,मूर्तिकार, कोल्हापूर
पावसाळ्यामुळे 25 टक्क्यांपेक्षा अधिक मूर्ती बाजारामध्ये आल्या नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातून येणाऱ्या मूर्तींना सर्वात जास्त फटका बसला. पुरामुळे कोल्हापूर भागांतून येणाऱ्या मूर्ती आणि दुष्काळामुळे सोलापूर भागांतून येणाऱ्या मूर्ती विक्रेत्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत. परिणामी पेणमधून अधिक मूर्ती मागवाव्या लागल्या. पाण्याची पातळी जास्त असल्याने मूर्तीकारांकडे तयार मूर्ती ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती पेणमध्ये असल्याने त्या परिसरांतून येणाऱ्या मूर्तींचे प्रमाण कमी आहे.
– अमोल जोशी, मूर्ती विक्रेते, पुणे